मनसेने राज्य सरकारचे निर्बंध असताना देखील ठाणे, दादरमध्ये दहीहंडी (Dahi Handi) फोडली. यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी मनसेवर (MNS) जोरदार निशाणा साधला आहे. हे करा नाहीतर आम्ही हे करु, असा इशारा देणाऱ्यांचा समाचार घेताना हे काय स्वातंत्र्य युद्ध नाही आहे, असं म्हटलं. ज्यांना गर्दी करायची आहे त्यांना केंद्राने राज्यांना पाठवलेलं पत्र दाखवतो, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या फाऊंडेशन आणि विहंग चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने ठाण्यात ऑक्सीजन प्लांटचे लोकार्पण मुख्यमंत्री ठाकरे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी दहीहंडी फोडणाऱ्या मनसेवर जोरदार निशाणा साधला. “संजय आपण बोललात काही जणांनी दहीहंडी साजरी केली. हे करा नाही तर आम्ही करु. हे काय स्वातंत्र्य युद्ध नाही आहे. कोरोनाचे नियम तोडून आम्ही हे करुन दाखवलं. हे काय स्वातंत्र्य नाही मिळवलं. त्याच्यासाठी आंदोलन केलं असतं तर भाग वेगळा,” असं मुख्यमंत्री म्हणाले.
कोरोनाचे संकट दिसत असतांना आरोग्य विषयक सुविधा निर्माण न करता काही जणांना यात्रा काढायच्या आहेत, जनतेचे प्राण धोक्यात आणणारे कार्यक्रम आयोजित करायचे आहेत. हे खुप दुर्देवी आहे. हे काही स्वातंत्र्य मिळवण्यासाठी केलेले आंदोलन नाही हे ही त्यांनी लक्षात घ्यायला हवे. हा जनतेच्या जीविताचा प्रश्न आहे. कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे, केंद्र सरकारनेही हेच सांगितले आहे. त्यांनी दहीहंडी आणि गणेशोत्सव काळात गर्दी टाळावी असे राज्याला पत्र पाठवून कळवले आहे. जे आंदोलन करू इच्छितात त्यांना केंद्र सरकारचे हे पत्र आपल्याला दाखवायचे आहे, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना फटकारलं.
हेही वाचा – आशीर्वाद कशाला हवेत, जनतेचा जीव घ्यायला?, मुख्यमंत्र्यांचा जन आशीर्वाद यात्रेवरुन हल्लाबोल