देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला थोपावण्यासाठी आणि कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी वेगाने उपाययोजना करण्यात येत आहे. केंद्र सरकारने देशातील १८ वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण मोफत करण्याची घोषणा केली आहे. २१ जूनपासून १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करण्याची परवानगीही दिली आहे. २१ जूनरोजीच देशात एकाच दिवसात ८० लाख नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार आणि कौतुक करण्यास सरकारी कार्यालये आणि संस्थांना सांगण्यात आल्याचे समोर आले आहे. मोदींच्या कौतुकांचे आणि आभार प्रदर्शन करणारे बॅनर लावले जात आहेत तसेच जाहीराती केल्या जात असल्यामुळे काँग्रेसने भाजप आणि केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.
देशात १८ वर्षांवरील नागरिकांचे कोरोना लसीकरण मोफत करण्यात येत असल्यामुळे युजीसीमार्फत सर्व विद्यालयांना धन्यवाद मोदीजी अशा प्रकारचे फलक लावायला सांगण्यात आले आहे. यामुळे देशातील नागरिकांनी आणि विरोधकांनी भाजपचा चांगलाच समाचार घेतला आहे. देशात २०१२ मध्ये एकाच दिवसात १७ कोटी मुलांचे पोलिओ लसीकरण करण्यात आले आहे. परंतु कधीही जाहीरातबाजी किंवा बॅनरबाजी केली नाही असा घणाघात काँग्रेसने केला आहे.
जीव वाचवण्याचा उद्देश होता
काँग्रेसने मोदी सरकारच्या चमकोगिरीवर सडेतोड टीका केली आहे. ८० लाख नागरिकांचे लसीकरण एकाच दिवसात केल्यामुळे मोदींचे आभार मानले जात आहेत. यावरुन काँग्रेसने म्हटलं आहे की, तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या काळात एका दिवसात १७ कोटी मुलांना पोलिओ डोस देण्यात आला होता. मात्र त्यावेळी ना पोस्टर्स होते ना मोठा प्रचार कारण तेव्हा उद्देश जीव वाचवण्याचा होता स्वतःची प्रतिमा चमकवण्याचा नाही असा घणाघात काँग्रेसनं केला आहे.
डॉ. मनमोहन सिंग यांच्या काळात एका दिवसात १७ कोटी मुलांना पोलियोचा डोस देण्यात आला होता.
मात्र त्यावेळी ना पोस्टर्स होते, ना मोठा प्रचार
कारण उद्देश जीव वाचवण्याचा होता, स्वत:ची प्रतिमा चमकावण्याचा नाही! pic.twitter.com/5etJvaU2S9
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) June 25, 2021