राज्यातील रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस अधिकच वाढ होत असून रविवारी तब्बल ३०४१ नवे रुग्ण सापडले. दोन महिन्यातील रुग्ण सापडण्याचा हा उच्चांक ठरला आहे. त्याचबरोबर रविवारी राज्यातील कोरोना रुग्णांनाही ५० हजारांचा टप्पाही ओलांडला असून राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ५० हजार २३१ झाली आहे. त्याचप्रमाणे ५८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून रविवारी ११९६ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आजपर्यंत १४ हजार ६०० कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.
मे महिन्यामध्ये कोरोनाचा उद्रेक झाला असला तरी गत आठवड्यात कोरोनाचे मोठ्या प्रमाणात रुग्ण मुंबई आणि राज्यात सापडले आहेत. आठवड्याच्या सुरुवातीला दीड हजाराच्या घरात असलेली रुग्ण संख्या आठवड्याच्या मध्यात दोन हजारावर आली. मागील दोन दिवसांत राज्यात सलग दोन हजार रुग्ण सापडत असताना रविवारी तब्बल तीन हजार रुग्ण सापडले. आतापर्यंत सापडलेल्या रुग्णांमध्ये हा सर्वाधिक आकडा ठरला आहे. ३०४१ कोरोनाबाधित रुग्ण सापडण्याबरोबरच आज राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांनी ५० हजारांचा टप्पाही ओलांडला असून राज्यातील रुग्ण संख्या ५० हजार २३१ झाली आहे. त्याचप्रमाणे राज्यात ५८ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून मृत्यूंची संख्या १६३५ झाली आहे. मृतांमध्ये मुंबईमध्ये ३९, पुण्यात ६, सोलापूरात ६, औरंगाबाद ४, लातूरमध्ये १, मीरा भाईंदरमध्ये १, ठाणे शहरात १ मृत्यू झाले आहेत. यामध्ये ३४ पुरुष तर २४ महिला आहेत. ६० वर्षे किंवा त्यावरील ३० रुग्ण आहेत तर २७ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर १ जण ४० वर्षांखालील आहे. या ५८ रुग्णांपैकी ४० जणांमध्ये ( ६७ %) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. आज नोंद झालेल्या मृत्यूपैकी ३८ मृत्यू हे मागील २४ तासांतील आहेत तर उर्वरित मृत्यू हे २३ एप्रिल ते २० मे या कालावधीतील आहेत.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३,६२,८६२ नमुन्यांपैकी ३,१२,६३१ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ५०,२३१ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या २२८३ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण १६,९१३ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ६६.६० लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे. सध्या राज्यात ४,९९,३८७ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ३५,१०७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.