महाराष्ट्रात सध्या तीन पक्षांचे सरकार सत्तेत आहे. निवडणुकीपुर्वी भाजप-शिवसेनेने एकत्र निवडणूक लढवली होती. मात्र निकाल लागल्यानंतर दोन्ही पक्षातील दरी दिवसेंदिवस वाढत गेली आणि त्यानंतर अनपेक्षितपणे शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस अशा तीन पक्षांनी एकत्र येत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. मात्र अजब आघाडीची चर्चा कशी सुरु झाली? हे एक कोडे होते. याबाबत पत्रकार सुधीर सुर्यवंशी यांनी लिहिलेल्या ‘चेकमेट: हाऊ द बीजेपी वोन अँड लॉस्ट महाराष्ट्र’ (Checkmate: How the BJP Won and Lost Maharashtra) या पुस्तकात एक किस्सा सांगण्यात आला आहे. ज्यामध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील आणखी एक किस्सा बाहेर आला आहे.
मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर ठरली योजना
विधानसभेचा निकाल लागल्यानंतर राष्ट्रवादी हा तीन नंबरचा पक्ष ठरल्याचे लक्षात येताच शरद पवारांनी आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेत आम्ही विरोधी पक्षात बसणार असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर ते पत्नीसह पुण्याकडे जाण्यास निघाले. मात्र पनवेलमधील कळंबोली नाक्यावर McDonald’s आऊटलेटजवळ संजय राऊत त्यांची वाट पाहत थांबले होते. पवार येताच राऊत त्यांच्या गाडीत जाऊन बसले. गाडी पुण्याच्या दिशेने मार्गस्थ झाली. राऊतांची गाडी देखील मागोमाग येत होती.
हे वाचा – पहाटे शपथविधी उरकण्यामागची कथा आणि फडणवीसांचे ‘मिरची हवन’
यावेळी राऊत यांनी पवारांच्या गाडीत तळेगाव टोलनाक्यापर्यंत प्रवास केला. या प्रवासात जवळपास तासभर राऊत आणि पवार यांच्यात खलबतं झाली. राऊतांनी भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी एकत्र येण्याचा प्रस्ताव पवारांसमोर ठेवला, असा दावा या पुस्तकात करण्यात आला आहे. या प्रस्तावानंतर पवारांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी याबाबत बोलू असे सांगितले. तर राज्यातील काँग्रेस नेत्यांशी राऊतांनी स्वतः बोलावे, असे देखील सांगितले.
तळेगाव टोलनाक्याजवळ पोहोचताच. राऊत पवारांच्या गाडीतून उतरून आपल्या गाडीत बसले आणि थेट मुंबई गाठून त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. उद्धव ठाकरेंना पवारांचा होकार कळविल्यानंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी आक्रमक पवित्रा घेत अर्ध्या अर्ध्या सत्तेचा फॉर्म्युला ठाकरेंनी मांडला होता. त्यानंतर भाजप-शिवसेनेत प्रतिक्रियांचे एक चक्र सुरु झाले, जे कधी थांबलेच नाही. त्यातून शिवसेनेने भाजपपासून फारकत घेत महाविकास आघाडी स्थापन केली, हे सर्वांना माहीत आहेच.