Maharashtra Political Crises | नवी दिल्ली – महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचे प्रकरण सात न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे वर्ग करावे की नाही याचा निकाल सर्वोच्च न्यायालय आज शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता देणार आहे. या निकालाकडे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचुड, न्या. एम. आर. शाह, न्या कृष्ण मुरारी, न्या. हिमा कोहली, न्या. पी. एस. नरसिम्हा यांचे खंडपीठ हा निकाल देणार आहे.
अरुणाचल प्रदेश येथे झालेल्या सत्ता बदलाचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी गेले होते. तेथे भाजपने कॉंग्रेसचे आमदार फोडून सरकार पाडले होते. त्यावेळी विधानसभा अध्यक्षांविरोधात अविश्वासाचा ठराव असेल तर ते आमदारांना अपात्र करू शकतात, असा मुद्दा न्यायालयासमोर होता. विधानसभा अध्यक्षांविरोधात अविश्वासाचा ठराव असेल तर ते आमदारांना अपात्र करू शकत नाही, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला. नबाम रेबिया नावाने हा निकाल प्रसिद्ध आहे. शिंदे गटाने याच निकालाचा आधार घेतला आहे. कारण विधानसभा नरहरी झिरवळ यांच्याविरोधात शिंदे गटाने अविश्वासाचा ठराव आणला होता. ईमेल करून हा ठराव आणला होता. त्यावेळी झिरवळ यांनी शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र ठरवले होते. मात्र नबाम रेबियाच्या निकालानुसार विधानसभा अध्यक्षांविरोधात अविश्वासाचा ठराव असेल तर ते आमदारांना अपात्र ठरवू शकत नाही, असा दावा शिंदे गटाने केला आहे.
मात्र अशाप्रकारे विधानसभा अध्यक्षांविरोधात जर अविश्वास ठराव आणला. तसेच पक्ष्यातील एक गट फुटून वेगळा झाला तर ते लोकशाहीसाठी घातक ठरू शकते. त्यामुळे नबाम रेबिया निकालाचा पुर्नविचार करण्यासाठी हे प्रकरण सुनावणीसाठी सात न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर वर्ग करावे, अशी मागणी ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात केली आहे.
सोमवारपासून सलग तीन दिवस या मागणीवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. ठाकरे गटाच्या मागणीला शिंदे गटाकडून विरोध करण्यात आला. त्यावेळी न्यायालयाने अनेक प्रश्नही उपस्थित केले. झिरवळ यांचा अविश्वास ठराव सभागृहात मांडण्यात आला नाही. त्यावर मतदान झाले नाही, असा मुद्दा सर्वोच्च न्यायालयाने उपस्थित केला. उभयंतांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यावर न्यायालयाने यावरील निकाल राखून ठेवला आहे. हे प्रकरण सात न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे द्यावे की नाही याचा निकाल उद्या सकाळी साडेदहा वाजता न्यायालय देणार आहे.