महाराष्ट्रातील सरकार हे खंडणीखोरांचे सरकार आहे. ते नाव महाराजांचे घेतील पण काम मुघलांचे करतील असा घणाघात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. दादरा नगर हवेली येथील सिल्वासामधून फडणवीसांनी शिवसेनेवर टीकास्त्र डागलं आहे. खंडणीखोरांचे सरकार नको असेल तर शिवसेनाला चोख प्रत्युत्तर द्या असे आवाहन फडणवीस यांनी दादरा नगर हवेलीमधील नागरिकांना केलं आहे. शिवसेनेचे इथे येऊन नाव महाराजांचे घेतील आणि काम मात्र मुघलांचे करतील त्यामुळे शिवसेनेला येऊ देऊ नका त्यांना महाराष्ट्रातच ठेवा असे फडणवीस म्हणाले.
राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दादरा नगर हवेली येथील सिल्वासामध्ये प्रचार सभेत बोलत होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक फडणवीसांनी केलं आहे. तर शिवसेनावर टीका केली आहे. शिवसेना संधीसाधू आहे. शिवसेना कशाप्रकारे राजकारण करत आहे हे तुम्ही पाहत आहात. दुःखालाही विसरण्याचा प्रयत्न शिवसेना करत आहे. मोदींचे नाव घेऊन निवडणूक लढवली आणि काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत सत्ता केली. हे लोकं केवळ संधी साधू आहेत. जेव्हा यांना निवणुका लढवायच्या असतात तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींची आठवण येते. पण जेव्हा निवडणुका जिंकतात तेव्हा केवळ सत्ता दिसते असा घणाघात फडणवीस यांनी शिवसेनेवर केला आहे.
महाराष्ट्रात खंडणीखोरांचे सरकार
दरम्यान फडणवीस यांनी पुढे म्हटलं आहे की, चांगले सरकार, चांगला खासदार देण्यासाठी जो आपल्या विरोधात शिवसेना उमेदवार लढत आहे. त्या शिवसेनेचे महाराष्ट्र, मुंबईतील काम पाहा, ज्या प्रकारे खंडणी प्रकार दिसत आहे. ते महाराष्ट्र सरकार नाही तर ते खंडणीखोरांचे सरकार आहे. तीच वसुली आता दादरा नगर हवेलीमध्ये सुरु करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. तुम्हाला दादरा नगर हवेलीमध्ये वसुली सरकार पाहिजे का? नको असेल तर त्यांना तुमच्याप्रकारे उत्तर द्या, ते जिथे आहेत तिकडेच त्यांना ठेवा, इथे येऊ देऊ नका जर आले तर नाव महाराजांचे घेतील परंतु काम मुघलांचे करतील असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्यामुळे त्यांना इथे येऊ न देता भाजपचे उमदेवार महेश गावित यांनाच लोकसभेवर पाठवा. त्यांना लोकसभेवर पाठवल्यास येणाऱ्या तीन वर्षांत मोठ्या प्रमाणात विकासकामे होतील असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दादरा नगर हवेलीमध्ये दिलं आहे.
हेही वाचा : परमबीर सिंह यांचं वेतन रोखलं; राज्य सरकारची कारवाई करण्यास सुरुवात