अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आता राजकीय वाद सुरु झाला असून माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी व्टीटच्या माध्यमातून नाराजी व्यक्त केली आहे. स्वा. सावरकर आणि अन्य प्रेरणादायी व्यक्तीमत्वांचा नामोल्लेख टाळत, ‘जेथे आमचे आदर्शच अपमानित होत असतील, त्यांचा यथोचित सन्मान होणार नसेल, तर तेथे जाऊन तरी काय करायचे?‘ असा नाराजीचा सवाल केला आहे.
९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला नाशिकमध्ये सुरुवात झाली आहे. संमेलनाचे स्वागताध्यक्ष पालकमंत्री छगन भुजबळ असल्याने संमेलनाला नियोजनापासूनच राजकीय स्वरुप आले आहे. त्यातच संमेलनाच्या शिर्षक गितात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा स्पष्ट उल्लेख न करता स्वातंत्र्य सूर्य असा करण्यात आला होता. त्यामुळे भाजपसह मनसेच्या पदाधिकार्यांनी नाराजी व्यक्त करीत निषेध केला होता. अखेर शिर्षक गित बदलून त्यात स्वा. सावरकर यांचा उल्लेख करण्यात आला. या वादाला देवेंद्र फडणवीस यांनीही फोडणी दिली आहे. फडणवीस आज नाशिक दौर्यावर येणार होते. मात्र संमेलनाला येणार का नाही याबाबत अनिश्चितता होती. मात्र आता त्यांनी ट्विटच्या माध्यमातून आपला रोष व्यक्त केला आहे. ट्विटमध्ये त्यांनी म्हटले कि, मराठी सारस्वतांचा पूर्णत: सन्मान आणि आदर आहे. त्यांना मी अभिवादन करतो. तसेच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुद्धा शुभेच्छा आहेतच. मात्र जिथे आमचे आदर्शच अपमानित होत असतील, त्यांचा यथोचित सन्मान होणार नसेल, तर तिथे जाऊन तरी काय करायचे? असा सवाल त्यांनी आयोजकांना केला आहे.
काय म्हटले आहे फडणवीस यांनी व्टीटमध्ये?
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला माझ्या खूप खूप शुभेच्छा! केवळ स्वातंत्र्यवीरच नाही, तर साहित्यातील सर्व अंगांनी परिपूर्ण कवि, नाटककार, कादंबरीकार, निबंधकार, पत्रलेखक, चरित्रलेखक, आत्मचरित्र लेखक, व्याकरणकार, पत्रकार, इतिहासकार आणि ज्यांनी मराठीला अनेक शब्द दिले, त्यांचे नाव साहित्यनगरीला न वापरण्याचा हट्ट कशासाठी? नाशिक ही स्वातंत्र्यवीरांची जन्मभूमी आणि कर्मभूमी सुद्धा. अ.भा. मराठी साहित्य संमेलन, अ. भा. मराठी नाट्य संमेलन आणि मराठी पत्रकार संघाच्या अधिवेशनाचे अध्यक्षपद सुद्धा त्यांनी भूषविलेले. असे तिन्ही बहुमान मिळालेले कदाचित ते एकमेव! या नगरीला कुसुमाग्रजांचे नाव दिले, याचे स्वागतच. पण केवळ स्वातंत्र्यवीरांचे नाव न देण्याच्या अट्टाहासातून त्यांचे नाव देण्यातून या दोन्ही महनियांची उंची आपण कमी करीत नाही का? असो,आमचे आदर्श, प्रेरणास्थान स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे व्यक्तिमत्त्व अजरामर आणि प्रत्येकाच्या मनात आहे. मराठी सारस्वतांचा पूर्णत: सन्मान आणि आदर आहे. त्यांना मी अभिवादन करतो. अ.भा. मराठी साहित्य संमेलनाला सुद्धा शुभेच्छा आहेतच. पण… जेथे आमचे आदर्शच अपमानित होत असतील, त्यांचा यथोचित सन्मान होणार नसेल, तर तेथे जाऊन तरी काय करायचे?