मुंबई: राज्यातील टोलचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. राज्यातील विविध ठिकाणच्या टोलच्या मुद्द्यावरून आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि मनसेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सह्याद्री अतिथीगृहावर भेट घेतली. बंद दाराआड झालेल्या या चर्चेनंतर राज ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाल्याचं सांगितलं. परंतु जी चर्चा झाली त्याच्यानुसार निर्णयापर्यंत येण्यासाठी एक बैठक उद्या सकाळी 8 वाजता माझ्या निवासस्थानी ठेवण्यात आली आहे. त्यानंतर 10 वाजता पत्रकार परिषद घेऊन मी भूमिका स्पष्ट करेन, असं राज ठाकरे यावेळी म्हणाले. (Discussion between Raj Thackeray and Eknath Shinde on toll waiver Meeting at Shivtirtha tomorrow at 8 o clock)
उद्या 10 वाजता पत्रकार परिषद
राज ठाकरे म्हणाले की, आता मुख्यमंत्री तसंच त्यांच्यासोबत असणारे सर्व अधिकारी , संबंधित मंत्री यांच्याशी आता आमची सविस्तर चर्चा झाली. परंतु या चर्चेनंतर त्याच्या निर्णयापर्यंत येणं याच्यासाठी म्हणून उद्या सकाळी 8 वाजता माझ्या निवासस्थानी (शिवतीर्थ) येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक पार पडल्यानंतर काय निर्णय होतो यासंदर्भात तुम्हाला माहिती देण्यासाठी मी सकाळी 10 वाजता पत्रकार परिषद घेणार आहे, असं राज ठाकरेंनी सांगितलं.
या बैठकीत टोलसंर्भात होणाऱ्या सर्व निर्णयांबाबत पत्रकार परिषदेत सविस्तर सांगेन, तसंच या संपूर्ण प्रकरणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सकारात्मक असल्याचंही राज ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केलं.
राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना रोखठोक सवाल
जनता रोड टॅक्स देते मग टोलचा भार कशाला असा रोखठोक सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केला. राज ठाकरे म्हणाले की, टोलची दरवाढ करण्यात आली आहे ती करू नये अशी मागणी करण्यात आली. टोल नाक्यांवर सुविधांचा अभाव का? महिलांसाठी शौचालयं का नाहीत, असा सवालही त्यांनी केला. रस्त्यांची अवस्थादेखील चांगली नसल्याचा मुद्दाही या बैठकीत राज ठाकरेंनी उपस्थित केला. टोल वसुलीच्या माध्यमातून युती सरकारच्या काळातील उड्डाणपूल आणि रस्ते बांधणीचा खर्च वसूल करण्यात येत आहे. मात्र, आता 2027 नंतर MMRDA टोल वसूल करणार असल्याचा मुद्दा राज ठाकरे यांनी उपस्थित केला.
(हेही वाचा: …तरुणांच्या भविष्याचा अन् सुरक्षेचा खेळखंडोबा करु नका; पोलीस कंत्राटी भरतीवरून पटोले स्पष्टच बोलले )