मुंबई – मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्णय प्रक्रियेला वेग देण्याचा प्रयत्न केला असून त्यांनी आत्तापर्यंत ३९९ फायलीचा निपटारा केला आहे. नवीन सरकारने सूत्रे स्वीकारल्यापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच कार्यभार सांभाळत आहेत. विशेषतः फडणवीस यांच्याकडे अजून कोणतेही खाते नसल्याने एकनाथ शिंदे यांनाच फायलींचा निपटारा करावा लागला. विविध भागात दौरे करतानाच शिंदे यांनी फायली निकाली काढण्यावर भर दिला आहे.
या विभागाच्या फाईल्सचा समावेश –
१ जुलै ते आत्तापर्यंत म्हणजे ८ ऑगस्टपर्यंतच्या कालावधीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ३९९ फाईल्सचा निपटारा केला आहे. यात नैसर्गिक आपत्तीमधील मदत, गरजूंना मदत, कृषि विभाग, मंत्रिमंडळासमोर आणायचे प्रस्ताव, फाईल्स, विविध नवीन शासकीय नियुक्त्या, सरळ सेवा भरती, वन विभाग, सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण अशा विविध विभागाच्या फाईल्सचा यात समावेश आहे.
पहिल्या बैठकीत सचिवांना निर्देश –
मुख्यमंत्र्यांनी आपल्या पहिल्या बैठकीत विविध विभागाच्या सचिवांना सर्वसामान्यांची तसेच जनहिताची कामे गतिमान रीतीने झाली पाहिजेत तसेच लोकांची कामे अडणार नाहीत हे पाहण्याचे निर्देश दिले होते.