करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना दिलासा देण्याची मागणी केली आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी करोनाच्या संकटामुळे दारिद्र्य रेषेखालील लोकांना सहाय्य करण्याची मागणी केली आहे. या व्यक्तींना दैनंदिन गरजेच्या मोफत आणि घरपोच गोष्टी द्यावात अशी मागणी त्यांनी केली आहे.
करोनाने घातलेल्या संकटामुळे राज्यात भितीचे वातावरण आहे. सरकारनेही अनेक सार्वजनिक गोष्टींवर तात्पुरती बंदी आणली आहे. ही बंदी गरजेची आहे. पण त्याचवेळी अनेक बाजारपेठा या काही दिवस बंद राहणा आहेत. पण या सगळ्या परिस्थितीत सर्वाधिक हाल हे हातावरचे पोट असणाऱ्यांचे होणार आहेत. जे लोक अतिशय गरीब आहेत, जे रोज कमावल्याशिवाय त्यांची चूल पेटू शकत नाही, अशा दारिद्र्य रेषेखालील लोकांसाठी हे दुहेरी संकट आहे. म्हणूनच अशा दारिद्र्य रेषेखालील लोकांना ताबडतोब गरजेचे असे किराणा, साबण, तत्सम गोष्टी या मोफत व शक्य असल्यास घरपोच द्याव्यात. जेणेकरून त्यांना या अडचणीत एक आधार होईल, त्यामुळे संबंधित यंत्रणेने याची ताबडतोब अंमलबजावणी करावे ही विनंती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केली.