उल्हासनगर । ठाणे अंमली पदार्थ विरोधी पथका ने शुक्रवारी पहाटे भालपाडा काटई बदलापूर रोडवर सापळा रचून एका इनोव्हा गाडीतून 90 किलो गांजा जप्त केला. या गांज्याची किंमत बाजार भावाप्रमाणे 17 लाख रुपये सांगण्यात येत आहे. या प्रकरणी हिल लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यातील तीन जणाना पोलिसांनी अटक केली.
ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा,कल्याण,भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ या शहरात मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची विक्री केली जात असल्याची माहिती समोर येत आहे. सर्वात अधिक झोपडपट्टी, कॉलेज आणि स्टेशन परिसरात अमली पदार्थांची विक्री केली जात असल्याचे समोर झाले आहे. तसेच गुटखाबंदी असतानाही गुटखा विकला जात आहे.
रवि मुन्नालाल जैस्वार उर्फ मोनु, हसन कयुम शेख आणि मोहम्मद शदाफ रियाज यांनी संगनमत करून इनोव्हा कारमधून गांजा आणला होता. या प्रकरणी अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस हवालदार विलास भांगरे यांच्या तक्रारीवरुन हिल लाईन पोलीस ठाण्यात तीन जणांवर गुन्हा दाखल झाला. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक रुपेश केणे करीत आहेत.