देशात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन जारी करण्यात आला. या लॉकडाऊनचा सर्वात मोठा फटका मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबाला बसला आहे. वेगवेगळ्या ठिकाणाहून मोलमजुरी करण्यासाठी आलेल्या लोकांवर लॉकडाऊनच्या काळात उपासमारीची वेळ आली आहे. हातात काम नसल्यामुळे एक वेळेचे जेवण मिळणे सुद्धा कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबातील एका १७ वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
या मृत तरुणीच नाव अनिता खेमचंद चव्हाण असून तिच्या पश्चात कुटुंबात वडील आणि तीन लहान भाऊ आहे. हे कुटुंब मध्यप्रदेशातून मोलमजुरी करण्यासाठी जळगावात आले होते. अनिताच्या आईचा मृत्यू झाल्यानंतर तिने भावंडांचा सांभाळ केला. अनिता वडील आणि भावंडांनी मोलमजुरी करून आणलेल्या पैशात घरातील उदरनिर्वाह भागवत होती. मात्र लॉकडाऊन करण्यात आल्यानंतर मोलमजुरी बंद झाली. त्यामुळे कुटुंबाची भूक कशी भागवायची? हा प्रश्न निर्माण झाला. मग काही दिवस सुरुवातील स्वयंसेवी संस्थांनी आणि शेजाऱ्यांनी जेवणाची आणि धान्याची मदत करत होते. परंतु ते देखील काही दिवसांनी बंद झालं.
मग सतत कोणाकडे हात पसरायचा असा प्रश्न अनिता समोर उभा होता. लहान भाऊ आणि वडील उपासमारीला तोंड देत असल्याचं अनिताला पाहून असह्य होत होतं. त्यामुळे तिने आत्महत्या केल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. अनिताच्या मृत्यू प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री आणि पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी चौकशीनंतर काय ते स्पष्ट होईल, असं सांगितलं आहे. सध्या अनितासारखे अनेक कुटुंब उपासमारीला तोंड देत आहे. शासन देखील याकरिता अनेक प्रयत्न करत आहेत.
हेही वाचा – राज्यात लवकरच पुन्हा सुरु होणार दारू विक्री – नवाब मलिक