भाजप नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा नाराजी दर्शवत पक्षाला घरचा आहेर दिला आहे. गेल्या दहा बारा वर्षात जन्माला आलेले नेते आता राजकारणात चमकायला लागलेत आणि आता आम्हाला अक्कल शिकवायला लागले आहेत, अशा शब्दांत एकनाथ खडसे यांनी सुनावलं आहे. राज्यातील जनतेत आणि मला मानणाऱ्यांमध्ये एक संतापाची लाट आहे. या संतापाचा कधी स्फोट होईल हे सांगता येत नाही, अशा इशारा देखील त्यांनी दिला आहे. एकनाथ खडसे त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते.
“मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार ही गोष्ट जनतेला का आवडली नाही? कोणत्या कारणासाठी लोकांनी नाकारलं? याचा मी शोध घेत आहे. मेहनतीने आणि कष्टाने आम्ही महाराष्ट्रात भाजपचं सरकार आणलं होतं. त्या वेळी आता जे नेते आहेत त्यातील अनेक लोक नव्हते. हे अलीकडे १०-१२ वर्षात जन्माला आलेले राजकारणात चमकायला लागले असून आम्हाला अक्कल शिकवत आहेत,” असं एकनाथ खडसे म्हणाले.
मी गेल्या चाळीस वर्ष पक्षाशी एकनिष्ठ आहे. पण पक्षाने माझ्यावर अन्याय केल्याची भावना माझ्या मनामध्ये आहे. महाराष्ट्राच्या जनतेत आणि मला मानणाऱ्यांमध्ये एक संताप असून या संतापाचा कधी स्फोट होईल हे सांगता येत नाही, असा इशारा खडसे यांनी दिला आहे. कोरोनाचं संकट गेल्यावर सर्व कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेणार असल्याचंही खडसे म्हणाले.