राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुंबईबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाचे पडसाद आता राज्यभरात उमटून लागले आहेत. अनेक राजकीय नेत्यांनी देखील त्यांच्या विधानाचा जाहीर निषेध व्यक्त केला. राज्यपालांच्या विधानावर एकीकडे विरोधक आक्रमक होत असताना दुसरीकडे शिंदे गटाकडूनही याचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी राज्यपालांच्या विधानावर नाराजी व्यक्त करत त्यांच्याविरोधात केंद्र सरकारकडे तक्रार करणार असल्याचे स्पष्ट केले.
दीपक केसरकर म्हणाले की, राज्यपाल हे घटनात्मक पद आहे. त्यामुळे कोश्यारींकडून यापुढे अशी विधाने येणार नाहीत अशा सुचना केंद्राने द्याव्यात अशी मागणी केसरकारांनी केली आहे. केसरकर पुढे म्हणाले की, मुंबईच्या उभारणीत सर्व समाजाचा मोठा वाटा आहे. त्यातही मराठी माणसाचा वाटा सर्वाधिक आहे. मुंबईतील औद्योगिक उभारणीत पारशी समुदायाचे मोठे योगदान आहे.
एखाद्या समाजाच्या कार्यक्रमात त्या समाजाने पैसा काढला की मुंबईत काही राहणार नाही असे विधान करणे म्हणजे राज्यपालांचा मुंबईबाबतचा अभ्यास कमी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्र दौऱ्यानंतर मुंबईत येतील तेव्हा सर्व आमदार राज्यपालांना भेटणार आहोत. राज्याच्या भावना राज्यपालांनी जपल्या पाहिजेत. त्यांनी राज्यपालांनी केलेल्या वक्तव्यावर मराठी माणसाच्या भावना केंद्राला कळाव्यात यासाठी मुख्यमंत्र्यांकडे आग्रह धरणार असल्याचेही केसरकर म्हणाले. केसरकर आज एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.
राज्यपाल कोश्यारी नेमक काय म्हणाले?
मुंबई आणि ठाण्यातून गुजराती आणि राजस्थानी लोकं निघून गेले तर मुंबईत पैसाच उरणार नाही. तसेच मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही असं वादग्रस्त विधान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले. मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील एका स्थानिक चौकाला दिवंगत श्रीमती शांतीदेवी चंपालालजी कोठारी यांचे नाव देण्यात आले. यावेळी त्यांनी हे विधान केले आहे.