महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या शनिवार आणि रविवारी लॉकडाऊन लावण्यात आले असून इतर दिवशी कडक निर्बंध आहेत. मात्र, आता पूर्ण लॉकडाऊनला पर्याय दिसत नसल्याचे उद्धव ठाकरे या बैठकीत म्हणाले. कडक निर्बंध लावताना गरीब, श्रमिक, हातावर पोट असणाऱ्या वर्गाला त्रास होऊ नये असे सर्वांनाच वाटते आहे. त्यादृष्टीने जरुर विचार झाला पाहिजे आणि केला जाईल, पण दररोज झपाट्याने वाढणारा संसर्ग आणि रुग्णवाढ काहीही करून प्रथम रोखणे अतिशय गरजेचे आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
परिस्थिती बिकट बनत चाललीये
रुग्णसंख्या इतक्या वेगाने वाढत आहे की, आज आपण लॉकडाऊनबाबत निर्णय घेतला नाही, तर उद्या आपोआपच लॉकडाऊनसारखी परिस्थिती उद्भवेल. हातावर पोट असलेला वर्ग सगळ्या विभागांत आणि क्षेत्रात आहे. त्यामुळे विचार करायचा तर सगळ्यांचाच करावा लागतो. आज परिस्थिती बिकट बनत चालली आहे. टास्क फोर्सच्या तज्ञांचे म्हणणे देखील आम्ही सातत्याने विचारात घेत आहोत. एका बाजूला जनभावना आहे, पण दुसऱ्या बाजूला कोरोनाचा उद्रेक आहे, अशा परिस्थितीत ही लढाई जिंकायची असेल तर थोडी कळ तर काढावीच लागेल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
युवा पिढीला लस देण्याची गरज
एकीकडे लसीकरण वाढवण्याची खूप गरज आहे. युकेने दोन महिने कडक लॉकडाऊन केला, पण त्या काळात मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम राबवून नागरिकांना संरक्षित केले. आज युवा पिढीला लस देण्याची गरज आहे. फायझर कंपनी १२ ते १५ गटातील मुलांनाही लस देण्याचे नियोजन करत आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. सर्वानुमते, एकमुखाने निर्णय घेऊन या संकटावर मात कशी करावी ते ठरवले पाहिजे. यासाठी लोकांमध्ये आपण सर्व पक्षांनी जागृती केली पाहिजे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.