राज्य शिक्षण मंडळातर्फे यंदा घेण्यात आलेल्या बारावी बोर्डाच्या फेरपरीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार यंदा राज्याचा एकूण निकाल २२.६५ टक्के लागला असून गेल्यावर्षीच्या तुलनेत निकालाचा टक्का घसरल्याचे दिसून आले आहे. गेल्यावर्षी या परीक्षेचा निकालाचा टक्का २४.९६ इतका होता. दरम्यान, शुक्रवारी जाहीर झालेल्या निकालाच्या आकडेवारीत लातूर जिल्ह्याचा निकाल ३१.४८ टक्के इतका लागला असून हा निकाल सर्वाधिक असल्याची माहिती आहे. तर, मुंबई विभागाचा निकाल यंदा १९.२७ टक्के लागल्याचे बोर्डाने जाहीर केले आहे.
जुलैमधील फेरपरीक्षेचा निकाल
शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या संकल्पनेतून दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये म्हणून गेल्या काही वर्षांपासून जुलैमध्ये फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार यंदा २७ जुलै ते ४ ऑगस्ट या काळात मुंबईसह एकूण नऊ विभागीय मंडळात ही परीक्षा घेण्यात आली होती. नऊ विभागीय मंडळातून एकूण १ लाख २ हजार ३१४ विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी एकूण २३ हजार १४० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असल्याचे बोर्डाने शुक्रवारी जाहीर झालेल्या निकालात स्पष्ट केले आहे.
निकालात झाली घसरण
शुक्रवारी जाहीर झालेल्या निकालात घसरण दिसली आहे. यंदा राज्याचा एकूण निकाल २२.६५ टक्के लागला आहे. गेल्यावर्षी हा निकाल २४.९६ टक्के इतका लागला आहे. तर तत्पूर्वी २७.०३ टक्के इतका लागला होता. तर मुंबई विभागाच्या निकालावर नजर टाकली असता यंदा मुंबई विभागाचा निकाल १९.२७ टक्के लागला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत हा टक्का वाढला असून गेल्यावर्षी मुंबई विभागाचा निकाल १८.७४ टक्के लागला होता. तर यंदा सर्वाधिक निकाल हा लातूर विभागाचा लागला आहे.
बारावी फेरीपरीक्षेच्या निकालाची आकडेवारी
विभाग २०१८ २०१७
पुणे २०.७७ २५.८९
नागपूर २५.५२ ३४.१३
औरंगाबाद २८.५० ३७.००
मुंबई १९.२७ १८.७४
कोल्हापूर २५.९४ २५.१६
अमरावती २१.४४ १९.३५
नाशिक २२.३२ २५.३६
लातूर ३१.४८ २७.३८
कोकण १९.७५ २०.९३
एकूण २२.६५ २४.९६