मराठा आरक्षणासाठी आज शिवसंग्रामचे नेते आणि आमदार विनायक मेटे यांच्या नेतृत्वाखाली बीडमध्ये मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा भाजपचा असल्याचं सत्ताधाऱ्यांनी म्हटलं आहे. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केलं आहे. मराठा आरक्षण लवकर मिळावं म्हणून जो कोणी मोर्चा, आंदोलन करेल त्याला आमचा पाठिंबा असेल. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जर मोर्चा काढला तर त्याला देखील आमचा पाठिंबा असेल, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
“मी याआधी देखील मांडणी केली आहे. केवळ बीड पुरतं नाही…केवळ विनायक मेटे यांच्या पुरतं नाही, तर जे जे मराठा समाजाला आरक्षण लवकर मिळावं यासाठी जे कोणी रस्त्यावर उतरतील…मग पवार साहेब जरी रस्त्यावर उतरले तर त्यांच्यामागे झेंडा न घेता…बिल्ला न घेता, गळ्यात भाजपचा गमछा न घालता आम्ही पवार साहेबांच्या मागे उभे राहू,” असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
मराठा आरक्षण प्रश्नी सरकार गंभीर नाही
मराठा अरक्षणावरून चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला. हे सरकार मराठा आरक्षण प्रश्नी गंभीर नाही आहे. मराठा आरक्षण प्रश्नी सरकार केवळ चालढकल करत आहे. या सरकारमध्ये विसंवाद आहे, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली. तसंच पुनर्विचार याचिका दाखल करा, ती कधी दाखल करणार? असा सवाल देखील चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारला केला आहे.