ठाण्यातील डॉ काशिनाथ घाणेकर नाटयगृहासमोरील होर्डींग कोसळल्याची घटना समोर आली होती. ही घटना घडल्यानंतर धोकादायक होर्डिंगचा प्रश्न पून्हा एकदा चव्हाटयावर आला आहे. कल्याण शहरातही अनेक धोकादायक होर्डिंग लावण्यात आले आहे. हे अनेक होर्डिंग चक्क रस्त्याच्या मधोमध उभारण्यात आले आहे. या भल्या मोठया होर्डिंगच्या मजबूती विषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. धोकादायक होर्डिंग कधीही कोसळून मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
नागरिकांमध्ये भितीचे वातावरण
काही महिन्यांपूर्वी पुण्यात होर्डिंग कोसळून चार जणांचे बळी गेल्याची घटना घडली होती. त्यावेळी प्रत्येक शहरातील धोकादायक होर्डिंगची समस्या समेार आली होती. सर्वच होर्डिंगचे स्ट्रक्चर ऑडीट करण्याचे आदेशही त्यावेळी देण्यात आले होते. मात्र ठाण्यातील होर्डिंग सुरक्षित असल्याचा निर्वाळा पालिकेकडून देण्यात आला होता. परंतु, मंगळवारी ठाण्यातही होर्डिंग कोसळल्याचा प्रकार घडल्याने नागरिक भयभित झाले आहेत.
होर्डिंग कोसळले त्याठिकाणी सायकल स्टॅण्ड होते त्यामुळे होर्डिंगखाली कोसळले नाही. सायकल स्टॅण्ड नसते तर मोठी दुर्घटना घडू शकली असती. मात्र कल्याणातील होर्डिंगची अशीच अवस्था आहे. कल्याण आग्रा रोडवर रस्त्याच्या मधोमध सहजानंद चौक पेट्रोल पंप या ठिकाणी होर्डिंग उभारण्यात आले आहे. त्या होर्डिंगच्या शेजारीच वीजेचे पोल सुध्दा आहेत.
नागरिकांकडून स्ट्रक्चर ऑडीटची मागणी
या होर्डिंगमुळे रस्त्यावरील प्रकाशही अडवला जाणार आहे. हा वर्दळीचा रस्ता असून येथून वाहनांची ये जा सुरू असते. त्यामुळे रस्त्याच्या मधोमध उभारण्यात आलेले होर्डिंग हे अपघातांना निमंत्रण देणारे आहेत. रस्त्यांच्या मध्यभागी असलेले हे जाहिरात फलक वाहनचालकांनाही विचलित करू शकतात. तसेच पत्रीपूल परिसरातही मोठ मोठी होर्डिंग आहेत. सतत वर्दळीच्या ठिकाणी असणा-या होर्डिंगचे स्ट्रक्चर ऑडीट करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.