मनी लाँड्रिंग (money laundering case) प्रकरणी सामना करत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. कारण मलिकांचे दाऊदशी थेट संबंध असल्याचं सकृतदर्शनी पुराव्यातून समोर आलं आहे, असं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं. अशातच भाजप नेते किरीट सोमय्या यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत मलिकांनंतर उद्धव ठाकरेंनीही मुख्यमंत्रीपदासाठी दाऊदशी दोस्ती केली?, असा आरोप सोमय्यांनी केला आहे.
उद्धव ठाकरेंचेही दाऊदशी संबंध निर्माण झाले आहेत का?
नवाब मलिक दाऊद गँगचे सदस्य आहेत हे सिद्ध झालं. पण आता चिंता महाराष्ट्राला ही आहे की जेलमध्ये गेल्यावर नवाब मलिकांना आपल्या मंत्रिमंडळात कायम ठेवणाऱ्या उद्धव ठाकरेंचेही दाऊदशी संबंध निर्माण झाले आहेत का? याबद्दल ठाकरेंनीच स्पष्टता करावी. बाळासाहेब ठाकरेंनी अनेकदा म्हटलंय की, शरद पवारांचे दाऊदशी संबंध आहेत. पण मुख्यमंत्रिपद वाचवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी शरद पवारांशी भागीदारी केली आणि आता शरद पवारांचे पार्टनर दाऊदशी पण भागीदारी केली, असं भाजप नेते किरीट सोमय्या म्हणाले.
किरीट सोमय्यांचा उद्धव ठाकरेंवरही आरोप
न्यायालय सांगतंय नवाब मलिक म्हणजे दाऊद. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत रस्त्यावर या आणि न्यायालयासमोर मोर्चा काढा. तुमचे प्रवक्ते दररोज न्यायालयाविरोधात बोलतात. न्यायालय हे पाकिस्तानचे आहे किंवा न्यायालय हे मोदींचे आहे, असं जरी उद्धव ठाकरेंनी म्हटलं तरी यामध्ये आश्चर्च वाटण्यासारखं काहीच नाहीये, असं सोमय्या म्हणाले.
वास्तविकरीत्या ही चौकशी न करता शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना हा सर्व आर्थिक व्यवहार माहिती होता. उद्धव ठाकरे हे स्वत: बिल्डर आहेत. तसेच त्यांचा मुलगा बिल्डर आहे. मातोश्रीपासून अगदी चार किमीच्या अंतरावर गोवावाला कंपाऊंड आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना एफएसआयचा रेट काय आहे हे सगळं माहिती होतं. उद्धव ठाकरेंचे एजेन्ट यशवंत जाधव यांनी गेल्या दोन वर्षांमध्ये जुन्या बिल्डिंग्स विकत घेतल्या. नवाब मलिकांचे पार्टनर उद्धव ठाकरे यांनी उत्तर द्यावं, असं सोमय्या म्हणाले.
दाऊद शरद पवारांचा माणूस
बाळासाहेबांचे विचार उद्धव ठाकरेंनी गहाण ठेवल्याचा आरोप करत सोमय्या म्हणाले की, मी स्टेजवर बसून बाळासाहेबांची भाषणं ऐकली आहेत. दाऊद शरद पवारांचा माणूस आहे, ते दोघे एकाच विमानातून गेले. पण मुख्यमंत्री पदासाठी त्यांच्या मुलाने वडिलांचे विचारच गहाण ठेवले, हे फक्त उद्धव ठाकरेच करू शकतात, असं सोमय्या म्हणाले.