देशभरात गोपाळकालाचा उत्साह शिगेला पोहचला आहे, विशेषत: महाराष्ट्रात कोरोनामुळे तब्बल दोन वर्षांनंतर अनेक ठिकाणी दहीहंदी उत्सव आकर्षण ठरत आहे. यात मुंबईत दहीहंडीचा विशेष उत्साह पाहायला मिळतोय. मुंबईत सकाळपासून दहीहंडीला सुरुवात झाली आहे. सध्या मुंबईत सगळीकडे दहीहंडीचा उत्साह दिसून येत आहे. मात्र मुंबईत या सणाला लागबोट लागले आहे. मुंबईत आतापर्यंत 12 गोविंदा जखमी झाले आहेत. त्यापैकी 5 जणांवर उपचार करून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 7 जणांवर पालिकेत रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं मुंबई महानगरपालिकेनं सांगितलं.
जखमींपैकी 5 जणांवर नायर रुग्णालय, 1 केईएम रुग्णालय, 01 ट्रामा हॉस्पीटल, 01 डॉ बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय, कांदिवली, 04 पोद्दार रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अशा एकूण 12 जखमींची नोंद झाली असून त्यापैकी 05 जणांवर उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. 7 रूग्णालयात दाखल असून प्रकृती स्थिर आहे. यात कोणतीही अनुचित घटना नोंदवली नसल्याचे पालिकेच्या वतीने सांगण्यात आले आहेत.
दरम्यान मुंबईसह, ठाण्यातही अनेक शिवसेना, भाजपसह अनेक राजकीय पक्षांनी दहीहंडी उत्सवाचे आयोजन करत पथकांसाठी लाखोंची बक्षीसे ठेवली आहे. त्यामुळे मुंबईतील विविध मंडळांमध्ये दहीहंडीचा उत्साह दिसून येत आहे. गोविंदा पथक पाच ते नऊ थरांपर्यंत मनोरे रचत ठिकठिकाणी हंडी फोडण्याचा मान मिळत आहेत. मात्र यात जखमी होत असल्याच्या घटना घडत असल्याने चिंता व्यक्त होत आहे.
यात काल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दहिहंडीचा आता क्रीडा प्रकारात समावेश करण्याची घोषणा गुरुवारी विधानसभेत केली. तसेच गोविंदांना शासकीय योजनांचा लाभही मिळणार आहे. यामध्ये गोविंदांसाठी शासकीय नोकऱ्यांमध्ये 5 टक्के आरक्षण असेल अशी घोषणाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली. याशिवाय दहिहंडीवेळी जर एखाद्या गोविंदाचा मृत्यू झाला तर त्याला शासनाकडून 10 लाख रुपये मदत देण्यात येईल. तसेच जर एखादा गोविंदा जबर जखमी झाला तर त्याला 7.5 लाख रुपये, अपघातात अपंगत्व आलं तर 5 लाख रुपये मदत देण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांनी याबाबत विधानसभेत निवेदन सादर केले आहे.
दहीहंडीचा समावेश क्रीडा प्रकारात करण्यात यावा अशी सर्वच गोविंदांची मागणी होती. त्यानुसार गोविंदा उत्सवाचा क्रीडा प्रकारात समावेश करुन ‘प्रो गोविंदा’ स्पर्धा राबवाव्यात. तसेच या स्पर्धा राज्य शासनाकडून राबवण्यात येतील. या स्पर्धकांना बक्षिसाची रक्कम शासनाकडून मिळेल. त्याचबरोबर इतर खेळांप्रमाणे या गोविंदांनादेखील शासकीय नोकऱ्यांमध्ये 5 टक्के कोट्याचा लाभ घेता येईल. तसेच इतर सुविधांचाही लाभ घेता येईल, असंही यावेळी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे.