महाराष्ट्रात गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण वाढलेले दिसले. तसेच कोरोनाबाधितांच्या संख्येतही घट झाल्याचे पाहायला मिळाले. गुरुवारी ८ हजार ०१० नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले होते. शुक्रवारी मात्र ७ हजार ७७६१ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. त्यामुळे आता एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ६१ लाख ९७ हजार ०१८ झाली असून अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १ लाख ०१ हजार ३३७ इतकी झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे, शुक्रवारी १३ हजार ४५२ रुग्णांनी कोरोनावर मात केली. राज्यात आजपर्यंत एकूण ५९,६५,६४४ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.२७ टक्के एवढे झाले आहे.
१६७ जणांचा मृत्यू
कोरोनाबाधित मृतांची संख्याही किंचित कमी झालेली दिसली. बुधवार आणि गुरुवारी राज्यात १७० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. तर शुक्रवारी १६७ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. राज्यात आतापर्यंत १ लाख २६ हजार ७२७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.०४ टक्के एवढा आहे.
४५७६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये
राज्यात आज ७ हजार ७६१ जणांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,५०,३९,६१७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६१,९७,०१८ (१३.७६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,८५,९६७ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये असून ४५७६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.