देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात कोरोनाबाधितांच्या संख्येत ६० हजारांहून अधिक रुग्णांची भर पडत आहे. त्यामुळे कालपासून (गुरुवार) राज्यात कडक लॉकडाऊन १ मेच्या सकाळी ७ पर्यंत लावण्यात आला. आज या कडक लॉकडाऊनला एक दिवस पूर्ण झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत किचिंत घट झाली असून कोरोनामुक्त होणाऱ्याची संख्या वाढली आहे. पण दुसऱ्या बाजूला चिंता वाढवणारी बाब म्हणजे कोरोना मृत्यूचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे.
गेल्या २४ तासांत राज्यात ६६ हजार ८३६ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ७७३ जणांच्या मृत्यू नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ४१ लाख ६१ हजार ६७६वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ६३ हजार २५२ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच आज ७४ हजार ४५ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यात आतापर्यंत एकूण ३४ लाख ४ हजार ७९२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८१.८१ टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.५२ टक्के एवढा आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २ कोटी ५१ लाख ७३ हजार ५९६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ४१ लाख ६१ हजार ६७६ (१६.५३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४१ लाख ८८ हजार २६६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २९ हजार ३७८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. तर ६ लाख ९१ हजार ८५१ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.
हेही वाचा – Maharashtra Lockdown 2021: अवघे २ तास अन् २५ पाहुणे, लॉकडाऊनचं पहिले लग्न उरकले माहिमच्या जोडप्याने