घरमहाराष्ट्रमहाविकास आघाडीत धुमशान

महाविकास आघाडीत धुमशान

Subscribe

संकटमोचक शरद पवार यांना आवताण

भाजप नेते अ‍ॅड. आशिष शेलार यांनी शनिवारी शरद पवारांची नरिमन पॉईंट येथील वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये अर्धा तास भेट घेतली. यावेळी मुंबई क्रिकेटविषयक कामानिमित्त चर्चा झाली असे सांगण्यात आले. मात्र त्यानंतर खरी राजकीय फटकेबाजी सुरु झाली. सोमवारी दुपारी नारायण राणे पार्टी पिचवरुन फटकेबाजीला उतरण्याची योजना ठरली. या सगळ्यात कडी केली ती बिल्डर निरज गुंडे यांनी. त्यांनी फडणवीस- ठाकरे यांच्या ’दोस्ती’ वर ट्विट केलं आणि धमाल उडवून दिली.

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी सोमवारी महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यशैलीवर आणि निर्णयक्षमतेवर भाजपच्या अधिकृत व्यासपीठावरुन जोरदार हल्ला चढवला. त्यानंतर मुख्यमंत्री ठाकरेंच्या ’मातोश्री’ निवासस्थानी बड्या नेत्यांसह तरुण नेत्यांची पळापळ सुरू झाली. उद्धव ठाकरे यांनी आपल्या संकटमोचकांना आवताण धाडल्यावर मात्र प्रशासकीय अधिकारी आणि माध्यमांच्या प्रतिनिधींनी ‘सावधान’ पवित्रा घेतला. भाजपवासी झाल्यानंतर प्रथमच प्रदेश कार्यालयातून माध्यमांना अधिकृतपणे सामोरे जाणार्‍या माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यशैलीवर आणि नेतृत्व क्षमतेवर तुफानी हल्ला चढवला.

- Advertisement -

मुख्यमंत्री मातोश्रीच्या पिंजर्‍यात कैद झाले असल्याची टीका करताना मंत्रालयाचे नाव सचिवालय करायला हवे, अशा स्वरूपाची खोचक टीका राणे यांनी केली आणि त्यानंतर राजकीय चक्र वेगाने फिरायला सुरुवात झाली. नवी मुंबई महापालिकेच्या आयुक्तांच्या बदलीला मिळालेली स्थगिती, मुंबईतील दोन किलोमीटरच्या परिघातील संचारबंदीला स्थगिती, आणि आयपीएस अधिकार्‍यांच्या बदल्यांनी झालेला गोंधळ यामुळे महाविकास आघाडीतील शिवसेना-राष्ट्रवादी यांच्यातील बेबनाव चव्हाट्यावर आला. या सगळ्यातून उद्धव ठाकरेंना प्रशासकीय पातळीवर आलेले अपयश आणि त्यातून सरकारी निर्णयाचा उडालेला बोजवारा सुरु असतानाच अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरचे सेनेतील पाच नगरसेवक उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत सहभागी झाले. त्याआधी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी अंबरनाथमधील राष्ट्रवादीचे ११ नगरसेवक शिवसेनेत घेतले.

पारनेरच्या पाच नगरसेवकांना पुन्हा पक्षात पाठविण्यासाठी शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी अजित पवार यांची मनधरणी सुरु केली. पण त्याला यश येणे कठीण वाटू लागल्याने काही तासात शरद पवार, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मातोश्रीला भेट दिली. त्यापाठोपाठ मुख्यमंत्री ठाकरे यांनी संकटमोचक एकनाथ शिंदे आणि खास मर्जीतील सुभाष देसाई यांना मातोश्रीवर बोलावून घेतले. त्यापाठोपाठ पवारांचे विश्वासू जितेंद्र आव्हाड आणि अजित पवार हे देखील मातोश्रीवर डेरेदाखल झाले. कोरोनाने आधीच हादरुन गेलेले ठाकरे सरकार या नेत्यांच्या पळापळीने अधिकच आचके द्यायला लागले. या सगळ्या राजकीय नाट्याला बदल्या हे कारण ठरले आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्री ठाकरे आणि शरद पवार यांच्यात समन्वयाबद्दल चर्चा झाली. त्यानंतर शरद पवार आणि अनिल देशमुख मातोश्री निवासस्थानाहून निघून गेले. ते निघून गेल्यानंतर काही वेळातच ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे मातोश्रीवर दाखल झाले. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार हेसुद्धा गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासह मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर गेले होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा कारभार बघता हे सरकार फक्त शिवसेनेचे असल्यासारखे असून मातोश्रीवर बसून ते राज्याचा कारभार हाकत असल्याने मित्रपक्षांमध्ये नाराजी आहे. मुळात राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांना विश्वासात न घेता ते निर्णय घेत असल्याने सहकारी पक्ष नाराज आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार हे उद्धव ठाकरे यांना समजावून चुकीचे निर्णय फिरवून तडजोडी करत असले तरी हे ठिगळ जोडण्याचे काम फार काळ चालू शकत नाही. मुख्य म्हणजे त्यांच्या पक्षातच सध्या दोन गट पडल्याचे दिसत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड असे ते दोन गट आहेत. आव्हाड हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री यांना बोलावून त्यांच्याकडून खात्याची तसेच त्यांच्या मतदारसंघाची माहिती घेताना दिसत आहेत.

हेच मंत्री मग अजित पवार यांच्याकडे जाऊन आव्हाड आता प्रमुख नेते झाल्याची तक्रार करतात. मात्र एक धनंजय मुंडे सोडले तर अजितदादांशी निष्ठावंत कोणी दिसत नसल्यामुळे उपमुख्यमंत्र्यांनी सध्या सबुरीचे धोरण स्वीकारल्याचे दिसते. काँग्रेसची अवस्था तर शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या मागे फरफटत चालल्यासारखी असल्याने त्यांचे मंत्री आणि नेते खूप नाराज आहेत. काँग्रेसमधील एक गट फुटून भाजपला मिळू शकतो, असे बोलले जाते. ही नाराजी लक्षात घेऊन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्र्यांची भेट मागितली होती, पण त्यांना वाटाण्याच्या अक्षता लावल्यामुळे थोरात यांची अवस्था सांगता येत नाही आणि सहनही होत नाही, अशी झाली आहे.

ठाकरेंभोवती निवडून न येणार्‍या नेत्यांची गर्दी
उद्धव ठाकरे यांच्याभोवती मातोश्रीवर सध्या जनतेमधून निवडून न येणार्‍या नेत्यांचा कोंडाळा वाढला आहे. सुभाष देसाई, अनिल परब, मिलिंद नार्वेकर यांच्या सल्ल्यानुसार मुख्यमंत्री निर्णय घेत असल्याचे सांगितले जाते. यामुळे एकनाथ शिंदे यांच्यासारखा या घडीला शिवसेनेत सर्वात मोठी ताकद असलेला नेता मागे पडत आहे. हे कमी म्हणून की, काय हे महाविकास आघाडी सरकार सत्तेत आणण्यासाठी ज्यांनी महत्वाची भूमिका बजावली ते शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनाही सध्या दोन हात दूर ठेवले गेले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -