कर्नाटक राज्यात आज 224 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. या निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांची सर्व ताकद पणाला लावलेली पाहायला मिळाली. त्यांनी रोड शोच्या माध्यमातून कर्नाटकातील जनतेला आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. भाजपच्या सर्वच प्रमुख नेत्यांनी कर्नाटकातील प्रचार सभेला हजेरी लावली होती. पण आता याच मुद्द्यावरून ठाकरे गटाचे खासदार आणि प्रमुख प्रवक्ते संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधलेला पाहायला मिळाला. पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी याबाबत आपले मत व्यक्त केले.
हेही वाचा – Maharashtra Political Crisis : सत्तासंघर्षाचा निकाल काही तासांवर; ज्येष्ठ विधिज्ञांनी वर्तवली ‘ही’ शक्यता
पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत म्हणाले की, दक्षिणेतील कर्नाटक हे महत्त्वाचे राज्य आहे. त्या ठिकाणी त्यांची सत्ता होती, पण ती आता राहणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी, देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्यापासून संपूर्ण केंद्रीय मंत्रीमंडळ, देशभरातले राज्यातील भाजपचे नेते, मुख्यमंत्री यांनी नेहमीप्रमाणे कर्नाटकात ठाण मांडलं. या ठिकाणी पैशाचा महापूर उसळला. यंत्रणा वापरली. अगदी बजरंग बलीला निवडणुकीत उतरवलं. हनुमान चालीसा यांचा वापर केला. पण यांना कोणताही देव पावणार नाही, असा टोला राऊतांनी लगावला. तर बजरंग बलीच त्यांच्या डोक्यावर पराभवाची गदा मांडणार, असेही त्यांनी सांगितले.
मणिपूरमध्ये काय सुरु आहे. काश्मिरमध्ये पाच सैनिक मारले गेले. देशात इतके काही सुरु असताना आमचे देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री हे प्रचारात व्यस्त राहतात. मणिपूर पेटलयं, तुमच्या हातातून गेलंय मणिपूर, अशा परिस्थितीत तुम्ही पंतप्रधान असून सु्द्धा रोड शो करतायं. पण तरी सुद्धा कर्नाटकात भाजपचा दारूण पराभव होत असताना दिसत आहे.
हे पाप आहे…
गेल्या 65 वर्षांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाप्रकरणी आम्ही लढा देत आहोत. आत्तापर्यंत शिवसेना म्हणवून घेणारे कोणीही, बाळासाहेबांच्या विचारांना मानतो असे सांगणारे कोणाही महाराष्ट्र-बेळगाव सीमा भागात जाऊन महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पराभवासाठी प्रयत्न करत नव्हता. यावेळी पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी प्रथमच सीमाभागामध्ये मराठी बांधवांचा, एकीकरण समितीचा पराभव व्हावा, म्हणून शर्थ केली. तर एकीकरण समितीच्या पराभवासाठी कोट्यवधी रुपये पाठवले आहेत, हे पाप आहे. कर्नाटकात मोठ्या प्रमाणात पैशांचा वापर झाला. महाराष्ट्रातील खोके संस्कृती तिकडे सुरू करण्याचा प्रयत्न झाल्याने आम्ही त्यांचा निषेध करतो, असे म्हणत संजय राऊत यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले.