जालना : आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे आणि विचित्र मागण्यांमुळे कायमच चर्चेत राहणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. आज पहाटे 6.30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. या प्रकरणी भोईवाडा पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे पाहायला मिळत आहे. परंतु हा हल्ला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यामुळे झाला असल्याचा आरोप सदावर्ते यांच्याकडून करण्यात आला आहे. त्यामुळे सरकारने जरांगे यांचे फारसे लाड न करता त्यांना तत्काळ अटक करावी अशी मागणी सदावर्ते यांच्याकडून सरकारकडे करण्यात आली आहे. परंतु, मनोज जरांगे पाटील यांनी सदावर्ते यांच्याकडून करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावण्यात आले आहेत. (Manoj Jarange rejected the allegations of Gunaratna Sadavarte)
हेही वाचा – गाडीची तोडफोड झाल्याने गुणरत्न सदावर्ते संतापले, म्हणाले – “जरांगेला तत्काळ अटक करा”
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील हे या घटनेबाबत बोलताना म्हणाले की, नेमके काय झाले आहे, त्याबद्दल मला काहीच माहित नाही. मराठा समाज शांततेत आंदोलन करत आहे. जर सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला झाला असेल, तर त्याचे आम्ही समर्थन करत नाही. तसेच, सदावर्ते यांच्याबद्दल आम्हाला काहीच बोलायचे नाही. या हल्ल्यासाठी ते कोणाचे देखील नाव घेतील. उद्या ते देवेंद्र फडणवीस यांचे नाव देखील घेतील. आम्ही कसे उपोषण करावे याबद्दल त्यांनी सांगण्याची गरज नाही. त्यांनी त्यांचे पाहावे. मराठा समाजाला उचकवण्याचा प्रयत्न सदावर्ते करतात. त्यामुळे आम्हाला त्यांच्याबद्दल काहीच बोलायचे नाही.
मराठ्यामध्ये माणुसकी जिवंत आहे. मराठ्यांनी सरकारचे खूप लाड केले. त्यांचे पोरबाळं आम्ही मोठे केले. समाजातील कोण कोण श्रद्धेय मराठ्यांना आरक्षण मिळवू देत नाहीत हे सर्वांना माहित आहे. मराठा समाजाने या श्रद्धेयांना खूप मोठे केले आहे. खूप लाड आहेत. ते आता विमानाने फिरतात. मराठ्यांनी मोठे केल्यामुळे त्यांची मुलं श्रीमंतीत जगतात. याची माहिती मी काही दिवसात समोर आणणार आहे. सगळ्या राजकीय पक्षाची लोक, सत्तेतील लोक मराठ्यांना मोठे होऊ देत नाहीत, असा थेट आरोप मनोज जरांगे यांच्याकडून करण्यात आला आहे.