कोरोना संकटाची सध्याची स्थिती पाहता आणि तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन मुंबई येथे होणाऱ्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशन ५ आणि ६ जुलै असं दोन दिवस होणार आहे. यावरुन भाजप टीका करत असताना आता मनसेने देखील टीका केली आहे. परीक्षेला जाताना जसं लहान मुलांच्या पोटात दुखतं तसं महाविकास आघाडीचं झालं आहे, असा टोला मनसे नेते संदीप देशपांडे यांनी लगावला आहे.
संदीप देशपांडे यांनी ट्विट केलं आहे. यामध्ये त्यांनी लोकांचे प्रश्न न सोडवल्यामुळे महाविकास आघाडी सरकारला अधिवेशन नको आहे, असं म्हटलं आहे. “लहान असताना मुलांचा अभ्यास झाला नसेल तर परीक्षेला जाताना त्यांना पोटात दुखतं नाहीतर डोकं दुखतं. तस काहीसं मविआ. सरकारचं झालं आहे. लोकांचे प्रश्न न सोडवल्यामुळे अधिवेशनच नको,” असं ट्विट देशपांडे यांनी केलं आहे.
लहान असताना मुलांचा अभ्यास झाला नसेल तर परीक्षेला जाताना त्यांना पोटात दुखत नाहीतर डोकं दुखतं.तस काहीसं म.वि.आ. सरकारच झालं आहे लोकांचे प्रश्न न सोडवल्या मुळे अधिवेशनच नको.
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) June 23, 2021
पावसाळी अधिवेशन केवळ दोन दिवस
कोरोनाच्या तिसर्या लाटेचा धोका लक्षात घेऊन मुंबई येथे होणारे विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन केवळ दोनच दिवस होणार आहे. ५ आणि ६ जुलै रोजी पावसाळी अधिवेशन पार पडेल. विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक विधान भवनाच्या प्रांगणात झाली. बैठकीत पावसाळी अधिवेशनामध्ये विधानसभा आणि विधानपरिषदेच्या कामकाजासंदर्भातील चर्चा करण्यात आली. अधिवेशनाच्या कामकाजातून प्रश्नोत्तर, तारांकित प्रश्न आणि लक्षवेधी आदी वगळण्यात आल्या आहेत.