महापालिका राखी तो कमिशन चाखी, सरकार राखी तो वसुली चाखी अशा शब्दात मनसे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर खोचक टीका केली आहे. राज्य सरकार आल्यापासून नव्या म्हणींचा जन्म झाला असल्याचे संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे. महाविकास आघाडी सरकारवर कोरोना, महापालिकेचा कारभार, रस्ते गटार अशा अनेक विषयांवरुन शिवसेनेवर मनसे टीका करत असते. संदीप देशपांडे यांनी कोविड सेंटरच्या कारभारावरुनही शिवसेना आणि मुंबई महानगरपालिकेवर निशाणा साधला होता. महापालिका निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर मनसेकडूनही तयारी सुरू असून महापालिकांच्या कारभारावर टीका करण्यात येत आहे.
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मुंबई महानगरपालिकेच्या आणि राज्य सरकारच्या कारभारावरुन महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. देशपांडे यांनी ट्विट करत कमिशन आणि वसुली तसेच पुण्याती फुकट बिर्याणीवरुन महाविकास आघाडीवर खोचक टीका केली आहे. संदीप देशपांडे यांनी ट्विट करत नव्या म्हणींसाठी राज्य सरकारचे आभार मानले आहेत.
संदीप देशपांडे यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “पाहिले एकच म्हण होती” तळे राखी तो पाणी चाखी”या सरकारच्या काळात अनेक नव्या म्हणींचा जन्म झालाय”शहर राखी तो बिर्याणी चाखी” “महापालिका राखी तो कमिशन चाखी” सरकार राखी तो वसुली चाखी”मराठी भाषेला नवीन म्हणी बहाल केल्याबद्दल मुख्यमंत्रांचे जाहीर आभार. आमचा सी.एम जगात भारी” अशी खोचक टीका केली आहे.
पाहिले एकच म्हण होती” तळे राखी तो पाणी चाखी”या सरकारच्या काळात अनेक नव्या म्हणींचा जन्म झालाय”शहर राखी तो बिर्याणी चाखी” “महापालिका राखी तो कमिशन चाखी” सरकार राखी तो वसुली चाखी”मराठी भाषेला नवीन म्हणी बहाल केल्याबद्दल मुख्यमंत्रांचे जाहीर आभार. आमचा सी.एम जगात भारी.
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) August 2, 2021
पुण्यातील डीसीपींच्या बिर्याणी प्रकरणावरही मनसेकडून टीका करण्यात आली आहे. तर महापालिकेच्या पावसाळीपुर्व कामांवरुनही शिवसेनेवर टीका करण्यात आली आहे. नालेसफाई ठीक झाली नसल्यामुळे मुंबईची होणारी तुंबई तसेच महाविकास आघाडी सरकाच्या नेत्यांवर करण्यात आलेल्या वसुलीच्या आरोपांवर नव्या म्हणी तयार करत संदीप देशपांडे यांनी टीका केली आहे.