महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे काढण्यासंदर्भात उघडपणे भूमिका घेतल्यानंतर त्यांना मागील काही दिवसांपासून सोशल मीडिया तसेच फोनवरून धमकावले जात असल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली आहे. पीएफआयच्या धमकीनंतर औरंगाबाद येथे १ मे रोजी होणारी राज यांची जाहीर सभा उधळून लावण्याचा इशाराही काही संघटनांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांना केंद्राकडून विशेष सुरक्षा पुरवण्यात येणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यावरुन आता मनसे आणि भाजपचे मनोमिलन अधिक घट्ट झाल्याची चर्चा सुरु झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून सातत्याने राज ठाकरेंना धमकीचे फोनही येत आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांना केंद्राने झेड प्लस दर्जाची सुरक्षा द्यावी, अशी मागणी मनसे नेत्यांनी केली आहे. त्यामुळे आता केंद्र सरकार राज ठाकरे यांना राज्य सरकारला पाठवलेल्या पत्राला सरकारने दुर्लक्ष केल्यानंतर आता मनसेचे डोळे केंद्रातील भाजप सरकारकडे लागले आहेत. या सुरक्षेच्या माध्यमातून भाजप-मनसे मनोमिलन अधिक घट्ट होण्याची शक्यता मनसे नेतृत्वाकडून वर्तवण्यात येत आहे.
राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे काढण्यासाठी महाविकास आघाडी सरकारला ३ मेपर्यंतचा अल्टिमेटम दिल्यापासून राज्यात ठिकठिकाणी धार्मिक वादाला सुरुवात झाली आहे. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया म्हणजेच पीएफआय या संघटनेने छेड़ेंगे तो छोडेंगे नही, असे म्हणत मशिदींवरील भोंग्यांना हात लावल्यास आम्हीही शांत बसणार नाही, असा इशारा मनसेला दिला आहे.
राज ठाकरे १ मे रोजी औरंगाबादमध्ये जाहीर सभा घेणार आहेत. त्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच राज ठाकरे ५ जून रोजी अयोध्या दौर्यावर जाणार आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांना विशेष सुरक्षा पुरवली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे, मात्र या वृत्तावर शिक्कामोर्तब झालेले नाही.