मुंबई : एका सर्वेक्षणानुसार लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत एकनाथ शिंदे यांचा आठवा क्रमांक आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी ट्वीट करत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कौतुक केले आहे. पण त्याचबरोबर त्यांनी विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले आहे.
हेही वाचा – BJP Vs Thackeray : ‘त्यांच्या’ मानसिक आरोग्यावर काय बोलणार? बावनकुळेंचा टोला
‘इंडिया टुडे’ने मूड ऑफ दी नेशन या शीर्षकाखाली देशातील 10 लोकप्रिय मुख्यमंत्र्यांची यादी प्रसिद्ध केली आहे. यात सर्वसामान्यांचे पंतप्रधान अशी स्वत:ची ओळख सांगणारे एकनाथ शिंदे थेट आठव्या क्रमांकावर आहेत. तर, पहिल्या क्रमांकावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, दुसऱ्या क्रमांकावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, तिसऱ्या क्रमांकावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा क्रमांक आहे. विशेष म्हणजे, एम के स्टॅलिन (तामिळनाडू), नवीन पटनायक (ओदिशा), सिद्धरामय्या (कर्नाटक), आणि हिमंत बिस्वा सरमा (आसाम) हे मुख्यमंत्री शिंदे यांच्या पुढे आहेत.
लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत आधी महाराष्ट्र टॉप 5 मध्ये असायचा आता टॉप 10 मध्ये असतो. #फरक_स्पष्ट_आहे, @IndiaToday #MoodOfTheNation सर्व्हेची ही आकडेवारी बघता महाराष्ट्र भाजपची विशेषता #D-team ची कारस्थाने यशस्वी होताना दिसतायेत.
सरकारमधील सत्तेच्या वर्चस्वासाठी… pic.twitter.com/YOWgInJ7LT
— Rohit Pawar (@RRPSpeaks) February 10, 2024
यावरून आमदार रोहित पवार यांनी ट्वीट करत 2021मधील अशाच सर्वेक्षणाची आकडेवारी दिली आहे. त्यामध्ये पहिल्या पाच लोकप्रिय मुख्यमंत्र्यांमध्ये महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चौथ्या क्रमांकावर आहेत. यासोबतच, लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत आधी महाराष्ट्र टॉप 5मध्ये असायचा, आता टॉप टेनमध्ये असतो; फरक स्पष्ट आहे, अशी टिप्पणी त्यांनी केली आहे.
हेही वाचा – Eknath Shinde : एकनाथ शिंदेंची लोकप्रियता घटली; टॉप टेन मुख्यमंत्र्यांच्या यादीत ‘या’ क्रमांकावर
मूड ऑफ दी नेशन या सर्व्हेची ही आकडेवारी बघता महाराष्ट्र भाजपाची, विशेषत: डी-टीमची कारस्थाने यशस्वी होताना दिसत आहेत, अशी टीका आमदार रोहित पवार यांनी केली आहे. वर्चस्वासाठी सत्ताधाऱ्यांमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत कुरघोड्यांमुळे ज्याप्रमाणे लोकप्रिय मुख्यमंत्री या सर्वेक्षणात महाराष्ट्र खाली सरकला आहे, त्याचप्रमाणे कायदा आणि सुव्यवस्था तसेच विकासाच्या बाबतीतही महाराष्ट्र खाली सरकत आहे. शिवाय हे सरकार असेच राहिले तर महाराष्ट्र आणखी खाली सरकत राहील, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.
हेही वाचा – Chhagan Bhujbal : मी गृहमंत्री असताना धमक्यांचे प्रकार थांबवले होते, भुजबळांचा इशारा कोणाकडे?