शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यावरून टीका केली आहे. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक त्यांच्या पक्षाने फार गांभीर्याने घेतली आहेत. पण देशासमोर वेगळे प्रश्न आहेत. पंतप्रधानांना मुंबईत यावं लागतंय म्हणजे भाजपचं राज्यातलं नेतृत्व कमकुवत आहे असा याचा अर्थ होतो. पण सरकार ट्रिपल असो किंवा चार इंजिनचं, मुंबईत शिवसेनेचाच भगवा फडकणार, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, यापूर्वी कधी नव्हे इतके पैसे केंद्राकडून राज्याला मिळाले, असं म्हणणं म्हणजे यापूर्वी केंद्र महाराष्ट्राला सूडबुद्धीने वागवत होते हे स्पष्ट होतं. असं करून त्यांनी महाराष्ट्राशी वैर घेतलं आहे. सरकार डबल इंजिनचं असो ट्रिपल किंवा चार इंजिनचं असो. पण, मुंबईत शिवसेनेचाच भगवा फडकणार, असं संजय राऊत म्हणाले.
संसदेत विरोधकांनी अदानीच्या खिशात एवढा पैसे कुठून आला याबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. याचे उत्तर मोदी द्यायला तयार नाहीत. पण ते निवडणूक प्रचारात व्यस्थ आहेत, असंही राऊत म्हणाले.
शिवसेनेने राहुल कलाटे यांना उमेदवारीचा प्रस्ताव दिलेला नव्हता. तसेच कलाटे कोणत्या पक्षाकडून उमेदवारी घेणार होते, हे मला माहित नाही. चिंचवडमध्ये तिरंगी लढत होणार आहे हे मला तुमच्याकडूनच कळतंय, असं राऊत म्हणाले.