अहमदनगर : नगर तालुक्यात गेली आठ दिवसांपासून वीज बिलांच्या वसुलीसाठी महावितरण करून डीपी बंद मोहीम सुरू करून शेतकर्यांना वेठीस धरले जात आहे. परिणामी, कांदा पेरणी करून डीपी बंद केल्याने पाणी देता येत नाही, कांदा जळू लागल्याने असह्य होऊन अकोळनेर येथील शेतकरी पोपट आबाजी जाधव (वय ५५) यांनी सोमवारी पहाटे आत्महत्या केली. दरम्यान, महावितरणच्या अधिकार्यांवर गुन्हे दाखल केल्यानंतर मृतदेह ताब्यात असा पवित्रा आंदोलकांनी घेतला.
अकोळनेर (ता.नगर) येथील पोपट जाधव हे उच्च शिक्षित होते. नोकरी न मिळाल्याने त्यांनी वडिलोपार्जित शेती सुरू केली. त्यांना अडीच एकर शेती आहे.या शेतीवर ते त्यांची २ मुले आणि पत्नी यांची उपजीविका सुरू होती. शेतीमध्ये सामुदायिक विहीर असून सामुदायिक वीज जोड आहे. कांद्याला बर्यापैकी बाजार भाव मिळत असल्याने त्यांनी आपल्या शेतात आठ दिवसांपूर्वी कांद्याची पेरणी केली होती.
एक पाणी दिल्यानंतर कांदा व्यवस्थित उगवून आला आणि अशातच वीज बिलांच्या वसुलीसाठी महावीतरण ने डीपी बंद केली.गेली आठ दिवस पोपट जाधव हे रात्री वीज आली की नाही हे पाहायला जात असत. पण वीज येत नसल्याने कांदा जळू लागला. अखेर महागाचे कांदा बियाणे आणि कष्ट डोळ्यादेखत मातीमोल होत असल्याचे असह्य झाल्याने त्यांनी सोमवारी पहाटे शेतातील चिंचेच्या झाडाला गळफास घेउन आत्महत्या केली. सकाळी उशिरापर्यंत ते घरी न आल्याने घरच्यांनी विचारपूस सुरू केली असता ही घटना उघडकीस आली. महावितरणच्या या वेठीस धरण्याच्या भूमिकेमुळे ग्रामस्थ आक्रमक झाले. संबंधित अधिकार्यावर, ऊर्जा मंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा व संबंधित शेतकरी कुटुंबाला आर्थिक मदत करावी या भूमिकेतून मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला.