Mumbai Corona Update: गेल्या वर्षी कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाल्यानं प्रशासनानं सुटकेचा निश्वास सोडला होता. मात्र आता पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. गेल्या २४ तासांमध्ये राज्यातून चिंताजनक आकडेवारी समोर आली आहे. वाढत्या कोरोनाचा वेग पाहता आरोग्य यंत्रणाही आता अलर्ट मोडवर आली आहे. वाढत्या कोरोना रुग्णाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्रालयाकडून बैठक बोलावण्यात आली. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आधीच खबरदारी घेण्यासाठी मुंबई महापालिकेच्या सर्व रुग्णालयात मास्क अनिवार्य करण्यात आले आहे. याशिवाय मुंबई महानगरपालिकेच्या सर्व कार्यालयात आणि महानगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना मास्क सक्ती करण्यात आली आहे.
कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना आता बीएमसीच्या सर्व रुग्णालयांमध्ये मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. हा नियम उद्यापासून म्हणजेच मंगळवार, ११ एप्रिलपासून लागू होणार आहे. आज, सोमवारी (१० एप्रिल) बीएमसी आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बैठक घेतली. या बैठकीतच हा निर्णय घेण्यात आला. बीएमसी कार्यालय आणि सर्व बीएमसी कर्मचाऱ्यांना मास्क सक्ती करण्यात येत आहे. यासोबतच ६५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांनाही मास्क सक्ती करण्यात आली आहे.
हे ही वाचा: “एकनाथांच्या राज्यात शेतकरी अनाथ”, CM च्या अयोध्या दौऱ्यावरून ‘या’ नेत्याची टीका
कोरोनाच्या वाढत्या आकडेवारीने मुंबईकराचं टेन्शन वाढलं आहे. रविवारी राज्यात ७८८ नवीन रुग्ण आढळले. एका जणाचा मृत्यू झाला आहे. राज्यात ४५८७ कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. तर आज ५६० रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ९८.१२ टक्के आहे. गेल्या काही दिवसांपासून दररोज ८००च्या पुढे कोरोना रुग्ण आढळून येत आहेत.
हे ही वाचा: CM एकनाथ शिंदे अयोध्येवरून थेट शेतकऱ्यांच्या बांध्यावर, बळीराजाने मांडली व्यथा
आकडेवारीनुसार, नवीन कोरोना रूग्णांच्या आगमनाने, महाराष्ट्रात आतापर्यंत एकूण ८१,४९,९२९ लोकांना कोरोना विषाणूची लागण झाल्याची माहिती मिळाली आहे आणि एकूण १,४८,४५९ लोकांचा या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.