घरताज्या घडामोडीCoronavirus: 'राज्यातील ८७ रेशन दूकाने निलंबित, ४८ दुकानांचे परवाने रद्द'

Coronavirus: ‘राज्यातील ८७ रेशन दूकाने निलंबित, ४८ दुकानांचे परवाने रद्द’

Subscribe

दुकानदारांना मारहाण करणे चूकीचे

राज्यात काही रेशन दुकानदारांनी गडबड केली असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्याबाबत सरकारने कारवाई केली आहे. अशा काळाबाजार करणार्‍या दुकानदारांवर आम्ही कारवाई करत आहोत. १९ एप्रिल पर्यंत राज्यातील एकूण ३९ रेशन दुकानदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून ८७ रेशन दुकानांचे निलंबन करण्यात आहे तर एकूण ४८ रेशन दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले आहे. तसेच यापुढेही स्वस्तधान्य दुकानांमध्ये काळाबाजार, वाटप करतांना कमी धान्य देणे किवा जास्त पैसे घेणे तसेच नियमांचे पालन केले जात नसेल तर कडक कारवाई करण्यात येईल. मात्र काही ठिकाणी दुकानदारांना मारहाण करण्याचे प्रकार घडलेत. दुकानदारांना मारहाण करणे चुकीचे आहे. मारहाणीच्या घटना थांबल्या नाही तर रेशन दुकानांना पोलीस संरक्षण देण्यात येईल. याबाबत महसूल अधिकार्‍यांशी चर्चा झाली आहे, अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

नाशिक येथे पत्रकारांशी बोलतांना ते म्हणाले, लॉकडाउनच्या काळात नागरिकांना रेशन दूकानांमधून धान्य वाटप करण्यात येत आहे. मात्र काही रेशन दूकानदारांच्या बाबतीत तक्रारी प्राप्त झाल्या त्यानूसार संपुर्ण राज्यात कारवाई करण्यात येत आहे. नागपूर महसूल विभागात एकूण ५ गुन्हे नोंदविण्यात आले असून १८ रेशन दुकानांचे निलंबन तर १ दुकानाचा परवाना रद्द करण्यात आला आहे.अमरावती महसूल विभागात एकूण ५ गुन्हे नोंदविण्यात आले असून ७ रेशन दुकानांचे निलंबन करण्यात आले तर १३ दुकानांचा परवाना रद्द करण्यात आला आहे. औरंगाबाद महसूल विभागात २९ रेशन दुकानांचे निलंबन करण्यात आले असून ४ दुकानांचा परवाना रद्द करण्यात आला आहे. नाशिक महसूल विभागात एकूण १६ गुन्हे नोंदविण्यात आले असून ९ रेशन दुकानांचे निलंबन करण्यात आले तर १५ दुकानांचा परवाना रद्द करण्यात आला आहे. पुणे महसूल विभागात एकूण ४ गुन्हे नोंदविण्यात आले असून १७ रेशन दुकानांचे निलंबन करण्यात आले असून १४ दुकानांचा परवाना रद्द करण्यात आला आहे. कोकण महसूल विभागात एकूण ९ गुन्हे नोंदविण्यात आले असून ७ रेशन दुकानांचे निलंबन करण्यात आले आहे. तर १ दुकानाचा परवाना रद्द करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मात्र असे असले तरी इतर दुकानदार धान्य वितरण करत आहेत त्यामुळे सगळेच दोषी असे म्हणता येणार नाही. रेशन संघटनेच्या दुकानदारांनी मारहाण होत असल्याने दुकाने बंदचा इशारा देण्ययात आला आहे. मात्र त्यांच्या सुरक्षा बंदोबस्त करत आहोत, इतकच नाही तर त्यांचा विमा उतरविण्याचा विचार करत आहोत, असे भुजबळ यांनी सांगितले.

- Advertisement -

केंद्राचा निर्णय स्वागतार्ह
यावेळी भुजबळांनी केंद्र सरकारच्या दुकाने सुरु करण्याच्या निर्णयाचे स्वागतच देखील केले. अर्थव्यवस्था सुरू झाली पाहिजे. केंद्राने दुकाने सुरू करण्याचा निर्णय घेतला तो स्वागतार्ह आहे, गेल्या महीनाभरापासून दुकाने बंद असल्याने सुरूवातीला थोडी गर्दी होईल परंतु सोशल डिस्टन्सिंगचे नियमाचे पालन व्हायला हवे. नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी. नागरिकांमध्ये आता करोनाविषयी जनजागृतीही मोठया प्रमाणावर झाली आहे. 100 टक्के सगळीकडे दुकाने सुरू होईल असे शक्य नाही. धोकादायक भागात दुकाने सुरू होणार नाहीत, असेही त्यांनी सांगितले.

डाळीचे वाटपही लवकरच
भारत सरकारकडून डाळ येत आहे. डाळीचे वाटप लवकर केले जाईल असे ते म्हणाले. राज्यातील साडेबारा कोटी लोकांपैकी साडेसात कोटी लोकांना साडेतीन लाख टन अन्न धान्य पोहोचवले आहे. केंद्राचा मोफत तांदूळ 95 टक्के लोकांना दिला आहे. केसरी कार्डधारकांना 3 कोटी लोकांना कमी दरात तांदूळ गहू वाटप सुरू केले, असेही त्यांनी सांगितले. मुंबई, औरंगाबाद, नागपूर , अमरावती विभागात केसरी कार्डधारकांना अन्न धान्य वाटप सुरू केले आहे. नाशिकमध्ये 1 मे नंतर तर पुणे ग्रामीण मध्ये 26 एप्रिल नंतर धान्य वाटप सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -