शहरात गेल्या १८ दिवसांमध्ये विविध ठिकाणी माथेफिरुंकडून एकूण ७ दुचाकी जाळण्यात आल्या. हुनमान नगरात घरासमोरील दोन दुचाकी जाळून टाकल्याची घटना गुरूवारी (दि. १०) मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान असून पोलिस प्रशासनाकडून कारवाई न करता झोपेचे सोंग घेतले आहे. दुचाकी जाळणारे संशयित सीसीटीव्हीत कैद असतानाही पोलीस आरोपींना अटक करत नसल्याने आता संशय निर्माण झाला आहे.
कशी घडली घटना
रामेश्वर कॉलनी परिसरात संजय रंगराव रंगारी हे वास्तव्यास आहेत. घरासमोर गुरुवारी रंगारी यांनी नेहमीप्रमाणे त्यांची दुचाकी अॅक्टिवा (एमएच- १९- एआर-६९०२) लावली होती. मध्यरात्री माथेफिरुने त्यांची दुचाकी जाळण्याचा प्रयत्न केला. रस्त्याने ये-जा करणार्या कामगारांकडून रंगारी यांना दुचाकी जळत असल्याची माहिती दिली. त्यांनी पाणी मारून दुचाकी विझवली. वेळीच प्रकार लक्षात आल्याने दुचाकी वाचली. अन्यथा दुचाकीची राखरांगोळी झाली असती.
रंगारी यांनी त्याचे घरातील काही खोल्या भाडेकरारावर दिल्या आहे. बँकेत नोकरी करणार्या मूळ शिवाजीनगर येथील पूजा कोळी या बहिणीसह राहतात. पूजा हिनेही तिची दुचाकी (एमएच- १९-६८९४) गेटमध्ये लावली होती. यादरम्यान रंगारी यांच्या दुचाकीसह माथेफिरुंनी पूजा हिची दुचाकी जाळली. प्रकार लक्षात आला. तोपर्यत कोळी यांच्या दुचाकीची राखरांगोळी झालेली होती.
या पूर्वी झालेल्या घटना
शिवाजीनगर येथे २४ डिसेंबरलो दोघा भावांच्या घरासमोरील दुचाकी जाळल्या होत्या. याचदिवशी ईश्वर राजपूत व त्यांचा मुलगा विक्की राजपूत या पिता-पूत्रांच्या दोन्ही दुचाकींची राखरांगोळी झाली होती. ८ जानेवारीला पिंप्राळा परिसरातील संत मिराबाई नगरमध्ये जगदीश कुळकर्णी यांची दुचाकी जाळली होती. विशेष म्हणजे कांचननगरातील घटनांमध्ये दुचाकी जाळताना तीन तरुण सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. मात्र पोलिसांकडून कुठलीही कारवाई झालेली नाही. कारवाई होत नसल्याने दुचाकी जाळणार्यांची हिंमत वाढली असून दुचाकी जाळणारे जोमात व पोलीस कोमात असे चित्र पहावयास मिळत आहे.