जेथे पर्यावरणाला हानी पोहोचणार असेल अशा महत्वपूर्ण व संपूर्ण प्रतिबंधित असलेल्या गड, डोंगर किंवा ऐतिहासिक वारसा स्थळांवर उत्खनन करण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिले. पर्यावरणाचा शाश्वत विकास व समतोल राखण्यासाठी गठीत गौण खनिज टास्क फोर्सच्या आज झालेल्या पहिल्या बैठकीत जिल्हाधिकारी सूरज मांढरे बोलत होते.
गौण खनिजांच्या उत्खननाबाबत संपूर्ण प्रतिबंधित क्षेत्र, मध्यम सवलत असणारे क्षेत्र आणि खुले क्षेत्र या टप्प्यात नियमानुरूप निर्णय घेण्यात येणार असून पर्यावरणास हानीकारक असलेले उत्खनन त्वरीत थांबविण्यात येईल. कृतीदलाने निश्चत केलेले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी संबंधित तज्ज्ञांची मदत घेवून, एकत्रितपणे केलेल्या कामाबाबत सर्वानुमते निर्णय घेण्यात येणार आहे. कृतीदलात समावेश असणार्या सदस्यांचे लघु गट तयार करून संबंधित विषयाबाबत वेळोवेळी आढावा घेण्यात येईल. गौण खनिजांच्या उत्खननाबाबत तक्रारी असल्यास परिस्थितीचा विचार करून त्यावर निर्णय घेण्यात येईल.
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी कृती आराखडा तयार करून त्याबाबत संबंधित सर्व गटांनी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही यावेळी जिल्हाधिकार्यांनी दिल्या. बैठकीस कृती दलाचे समन्वयक अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, उपवनरक्षक (पूर्व व पश्चिम) पंकज गर्ग, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सिद्धार्थ तांबे, उपस्थित होते.