सटाणा : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आलेल्या कांद्याचा ११ वाजेपर्यंत लिलाव न झाल्याने शेतकर्यांनी बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोर सटाणा-मालेगाव रस्त्यावर रास्तारोको आंदोलन केले. अचानक शेतकर्यांनी उचललेल्या आंदोलनाच्या पवित्र्यामुळे प्रशासनाची धावपळ उडाली.
गुरूवारी (दि. १८) बाजार समितीत कांद्याचा लिलाव सुरळीत झाला. शुक्रवारी सुट्टी असल्याचे जाहीर न केल्यामुळे शेतकर्यांनी कांदा विक्रीसाठी बाजार समितीत आणला. सकाळी ९ वाजता लिलाव सुरू होईल या अपेक्षेने शेतकर्यांनी कांदा लिलावासाठी जमिनीवर ओतला. ११ वाजले तरी देखील व्यापारी लिलावासाठी न आल्याने शेतकर्यांनी चौकशी केली असता आज सुट्टी असल्याचे कळाले. कांद्याला आधीच कवडी मोल भाव मिळत असून जो कांदा विक्रीसाठी आणला आहे तोही ओला होत आहे. पावसाच्या दिवसामुळे व्यापा-यांकडून शेतकर्यांची अडवणूक होत आहे असे म्हणत संतप्त झालेल्या शेतकर्यांनी सटाणा मालेगाव रस्त्यावर ठिय्या मांडून जोरदार घोषणाबाजी केली.
यावेळी दुतर्फा वाहतुक कोंडी निर्माण झाली होती. बाजार समितीचे सचिव भास्कर तांबे यांनी आंदोलन स्थळी धाव घेऊन शेतकर्यांच्या तीव्र भावना समजावून घेतल्यात याच वेळात सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण पाटील, वर्षा जाधव या वाहतूक नियंत्रणात आणण्यासाठी आंदोलन स्थळी पोहोचले. सचिव भास्कर तांबे यांनी शेतकर्यांच्या आंदोलनाची कल्पना देऊन त्यांना तातडीने लिलावासाठी पाचारण केले असता शेतकर्यांनी रास्तारोखो आंदोलन मागे घेतले. दिवसभारात ९०० हुन अधिक कांदा विक्रीसाठी आलेल्या वाहणांचा लिलाव करण्यात आला तर १५०० रुपये पर्यंत आजचा बाजारभाव टिकून होता.