नाशिक : फिटस् या आजारावर विड्याच्या पानातून दिले जाणारे मोफत औषध घेण्यासाठी सोमवारी (दि.२१) देशभरातून रुग्णांची तोबा गर्दी उसळली होती. तब्बल एक किलोमीटरपर्यंत रुग्णांची रांग होती. नागपंचमीचे औचित्य साधून सरदार चौकातील गोपाल मंगल कार्यालयात अश्विनी दिनेश वैद्य, दिनेश मोहन वैद्य यांनी रूग्णांना विड्याच्या पानातून औषध दिले.
ब्रह्मलीन श्री रामलोचन स्वरूप, ब्रह्मचारीजी महाराजांच्या आदेशाने, सामाजिक सेवा या उद्देशाने हे औषध दिले जाते. विविध वनस्पतींचा वापर करून तयार केलेले हे औषध सर्वांसाठी विनामूल्य असते. चक्कर येऊन पडणे, मेंदूला झटके येणे, तसेच तोंडातून फेस येणे, दातखिळी बसणे म्हणजे फिट्स.त्यावरील औषध वाटपाचा हा उपक्रम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे.
ब्रह्मलीन श्री रामलोचन स्वरूप, ब्रह्मचारीजी महाराजांच्या आदेशाने हा उपक्रम अनेक वर्षे चालविला. आपण ज्या समाजात राहातो त्या समाजाचे आपण काहीतरी देणं लागतो. म्हणून हे कार्य विनामूल्य औषधाच्या स्वरूपातून देऊन समाजसेवा करत असल्याचा दावा वैद्य कुटूंबियांनी केला. यापुढील औषध १३ नोव्हेंबरला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळी ७ ते १२ या वेळेतच गोपाल मंगल कार्यालय (सरदार चौक) येथे देण्यात येईल. हे औषध कोणत्याही वयोगटातील रुग्ण घेऊ शकतात. वर्षातील तीन दिवस औषध घेतल्यास रुग्णांना किमान ५० टक्के फरक पडतो, असा दावा वैद्य यांनी केला आहे. दरम्यान, अचानक झालेल्या गर्दीमुळे सरदार चौकात वाहतूक कोंडी झाली होती. सरदार चौकात फिट्सवर मोफत औषधोपचार केला जात असल्याने हजारोंच्या संख्येने रूग्ण तैथे आले होते.
तीन डोसचा कोर्स
राज्याभरातून रूग्ण औषध घेण्यासाठी आलेले होते. होळी पोर्णिमा, नागपंचमी तसेच, दिवाळी आमावस्या अशा वर्षातून केवळ तीन वेळा हे औषध विनामूल्य दिले जाते. तीनवेळा औषध घेतल्यानंतर कोर्स पूर्ण होतो, असा दावा संयोजकांनी केला.