घरमहाराष्ट्रनाशिकमहावितरणचा बळीराजाला शॉक; शेकडो शेतकर्‍यांचा वीजपुरवठा खंडित

महावितरणचा बळीराजाला शॉक; शेकडो शेतकर्‍यांचा वीजपुरवठा खंडित

Subscribe

मनमाड : एकीकडे शासनाने शेतकर्‍यांचा वीज पुरवठा खंडित करण्यात येऊ नये असा आदेश दिलेला असताना दुसरीकडे मात्र मनमाड, नांदगाव, येवला यासह नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात वीज महावितरण कंपनीने शेतकर्‍यांकडून सक्तिने थकीत वीज बिल वसुली सुरु केली असून थकीत बिलापोटी किमान प्रत्येक शेतकर्‍याने पाच हजार रुपये भरण्याचा फतवा काढला आहे. ज्या भागातील शेतकर्‍यांनी पाच हजार रुपये भरले नाही त्या भागातील सुमारे 200 पेक्षा जास्त ट्रान्सफार्मर बंद करून वीज पुरवठा खंडित करण्यात आला असल्याने विजे अभावी शेकडो हेक्टरवरील पिके धोक्यात आली. त्यामुळे बळीराजा संकटात सापडला असून वीज महावितरणने दिलेल्या या शॉकमुळे शेतकर्‍यांमध्ये खळबळ उडून चिंता निर्माण झाली आहे.

दरम्यान, शेतकर्‍यांकडे कोट्यवधी रुपयांची थकबाकी असल्यामुळे महावितरण आर्थिक संकटात सापडले आहे. त्यामुळे थकबाकी वसुली सुरु करण्यात आली असून शेतकर्‍यांनी चालू बिल भरले तरी त्यांचा वीज पुरवठा खंडित केला जाणार नसल्याची माहिती वीज महावितरणकडून देण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांपासून कधी अस्मानी तर कधी सुलतानी असे एका पाठोपाठ एक संकट शेतकर्‍यांचा पिच्छा सोडायला तयार नाही. यावर्षी तर सलग झालेल्या मुसळधार आणि अतिवृष्टीमुळे पिके उद्ध्वस्त झाली असून खरीपाचा हंगाम हातातून निघून गेल्यानंतर शेतकर्‍यांच्या सर्व आशा रब्बीच्या हंगामावर असल्यामुळे त्यांनी कांदे, गहू, हरबरा, भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे.

- Advertisement -

चांगला पाऊस झाला असल्यामुळे छोटे, मोठे धरण, बंधार्‍यापासून शेततळे, विहिरीपर्यंत सर्वच तुडुंब भरले आहे. पाण्याचा मुबलक साठा असल्यामुळे पिके जोमात येतील अशी शेतकर्‍यांना आशा होती. मात्र त्यांच्या या आशेवर वीज महावितरणने पाणी फेरण्यास सुरुवात केली आहे. थकीत वीज बिल वसुलीसाठी महावितरणने धडक मोहीम सुरु केली असून ज्या भागातील शेतकर्‍याकडे मोठ्या प्रमाणात वीज बल थकले त्या भागातील विद्युत डिप्या बंद करून वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. मनमाड विभागात 104 विद्युत डीपी बंद करण्यात आल्या आहेत. त्यात मनमाड-नांदगाव तालुक्यातील 42 आणि येवला तालुक्यातील 62 डीपींचा समावेश आहे. मनमाड विभागाप्रमाणे नाशिक जिल्ह्यातील इतर भागात देखील हीच परिस्थिती असून जिल्ह्यात सुमारे 200 विद्युत डिप्या बंद करण्यात आल्या आहेत. वीज महावितरणने सुरु केलेल्या थकीत वीज बिल वसुली मोहिमेमुळे शेतकर्‍यांमध्ये खळबळ उडाली असून शेततळ्यात, विहिरीत पाण्याचा मुबलक साठा आहे मात्र वीज पुरवठा खंडित केला जात असल्यामुळे पिकांना पाणी कसे द्यायचे? असा प्रश्न शेतकर्‍यांना पडला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -