पंचवटी अतिप्राचीन श्री कपालेश्वर मंदिराच्या भिंतीचा दगड अचानक निखळून पडला. सुदैवाने याठिकाणी प्रदक्षिणा मार्गावर कोणताही शिवभक्त नसल्याने अनर्थ टळल्याचे मंदिर विश्वस्तांनी सांगितले.
प्रत्येक शिवमंदिर तथा शिवालयात नंदी असतोच, मात्र पंचवटीतील कपालेश्वर मंदिर हे भारतात एकमेव असे शिवमंदिर आहे, जेथे नंदी नाही. या एकमेवाद्वितीय मंदिरात दर्शनासाठी रोज हजारो भाविक देशाच्या कानाकोपर्यातून येतात. गेल्याच वर्षी महाराष्ट्र पर्यटन विकास विभागाअंतर्गत मंदिराचे वॉटर प्रुफिंगचे काम केले होते. यावेळी रॉक ब्रेकर लावून काम केले असल्याने दगडांचे सांधेच ढिले झाल्यामुळे कदाचित मंदिराचा दगड निखळून पडला असावा, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. श्रावण महिन्याच्या प्रारंभीच ही घटना घडली, परंतु ती श्रावणी सोमवारी घडली असती तर जीवितहानीचीही शक्यता नाकारता आली नसती.
श्रावण मास सुरू असल्याने श्री कपालेश्वर मंदिरात भाविकांची मोठी गर्दी असते. मंदिरातील दगड निखळूण पडला, परंतु सुदैवाने कुणाला इजा झाली नाही. हा दगड निखळूण पडण्याचे कारण म्हणजे मागील वर्षी पर्यटन विकास निधीअंतर्गत श्री कपालेश्वर मंदिरातील सभा मंडपाचे वॉटर प्रुफिंग करण्यासाठी ठेकेदाराने रॉक ब्रेकर्सच्या वापर केला. त्यावेळेस मोठ्या प्रमाणात मंदिराला हादरे बसले होते. परिणामी मंदिरातील दगड निखळत असतील. या कामाला आम्ही भाविकांनी त्यावेळी हरकत घेतली होती, कदाचित ते झाले नसते तर आज ही घटना घडली नसती.- देवांग जानी, गोदाप्रेमी
आमदार निधीतून गेल्या काही दिवसांपूर्वी या मंदिराचा जीर्णोद्धार व डागडुजीसाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले. तरीदेखील आज मंदिराची ही अवस्था झाली. भाविकांनी प्रदक्षिणा मारताना सावधगिरी बाळगावी.- अनिल कोठुळे