घरताज्या घडामोडीमालेगाव तालुक्यात प्रत्येक कुटुंबाची तपासणी सर्व्हेक्षणासाठी 400 पथके 

मालेगाव तालुक्यात प्रत्येक कुटुंबाची तपासणी सर्व्हेक्षणासाठी 400 पथके 

Subscribe

कोरोनासारख्या जीवघेण्या विषाणूने मालेगाव शहरात प्रवेश केला असून एकाचवेळी पाच कोरोनाबाधित रुग्ण आढळून येणे ही अतिशय गंभीर बाब आहे. यावर तातडीची उपाययोजना करण्यासाठी 400 पथके तयार करून संपुर्ण तालुक्यातील प्रत्येक कुटुंबाचे सर्व्हेक्षण करण्याचे निर्देश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिले आहेत.

शासकीय विश्रामगृह मालेगाव येथे गुरुवारी (दि.9) सर्व विभाग प्रमुखांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते, यावेळी राज्याचे कृषी तथा माजी सैनिक कल्याण मंत्री दादा भुसे, उपमहापौर निलेश आहेर, अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, महानगरपालिकेचे आयुक्त किशोर बोर्डे, उपायुक्त नितीन कापडणीस, अपर पोलीस अधिक्षक संदिप घुगे, उपविभागीय अधिकारी विजयानंद शर्मा, तहसिलदार चंद्रजित राजपूत, सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.किशोर डांगे, आरोग्य अधिकारी डॉ.सपना ठाकरे माजी आमदार आसिफ शेख यांच्यासह प्रशासनातील सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.

- Advertisement -

जिल्हाधिकारी म्हणाले, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ, शिक्षक व शासकीय कर्मचारी प्रत्येकी एक अशा तीन कर्मचाऱ्यांची एक टिम या प्रमाणे 400 टिम प्रत्येक नागरिकांचे सर्व्हेक्षणाचे काम करणार असून ज्यांना लक्षणे दिसून येतील त्यांच्यावर तात्काळ वैद्यकीय उपचारासाठी दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नागरिकांनी देखील या सर्व टिमला सहकार्य करावे. ‘कोरोना’ विषाणू हा मालेगावकरांच्या दारात येऊन ठेपला आहे, येणारे आठ दिवस अतिमहत्वाचे आहेत, म्हणून प्रत्येक नागरिकाने काळजी घ्यावी.

प्रशासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या उपाययोजना प्रभावीपणे व कडक स्वरुपात आता यापुढे राबविण्यात येणार आहेत. संपुर्ण तालुक्यातील परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कंट्रोल रुमची तात्काळ स्थापना करावी, स्वस्त धान्य दुकानात नागरिकांची गर्दी होऊ नये म्हणून धान्य वितरणाचे सुयोग्य नियोजन करावे, भाजीपाला वितरणासाठी मोजक्या हातगाड्यांना परवाने देवून घरपोच भाजीपाला पोहचवावा, मदतीसाठी पुढे येणाऱ्या स्वयंसेवी संस्थांची यादी तयार करून मिळणारी सर्व मदत एका छताखाली आणून प्रशासनामार्फत गरजू पर्यंत पोहचविण्याचे सुक्ष्म नियोजन करावे, अशा सुचनाही जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिल्या.

- Advertisement -

खासगी रुग्णालय क्वारांटाईन

पाचही कोरोनाबाधित रुग्णांचा निवासी परिसर सिलबंद करण्यात आला आहे. त्यांना झालेल्या संसर्गाची माहिती मिळविण्यासाठी युध्दपातळीवर काम सुरू आहे. या पाचही कोरोनाबाधित रुग्णांना कुठलीही प्रवाशी पार्श्वभुमी दिसून येत नसल्यामुळे प्रशासनापुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे. यासाठी कोम्बिंग ऑपरेशनही राबविण्यात येणार आहे. या पाच रुग्णांपैकी एका रुग्णाचा मृत्यू झाला असून उर्वरित चारही बाधीत रुग्णांमुळे अधिक रुग्ण बाधित होतील ही शक्यता लक्षात घेवून एक खासगी रुग्णालय पुर्णपणे क्वारांटाईन हॉस्पीटल म्हणून अधिग्रहीत करण्यात आले आहे. त्याठिकाणी या चारही बाधीत रुग्णांना पुढील उपचारासाठी स्थलांतरीत करण्यात येणार आहे. नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घेणे अत्यंत गरजेचे असून कुणीही घराबाहेर पडू नये यासाठी संचारबंदीची मुदत वाढविण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी मांढरे यांनी सांगितले.

आदेश न पाळणाऱ्यांवर कारवाईचे

नागरिकांनी घराबाहेर पडू नये, आपल्या दारापर्यंत रेशन, भाजीपाला, आरोग्य सुविधा पोहचविण्यासाठी प्रशासनामार्फत आवश्यक त्या उपाययोजना तयार करण्यात येत असून नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे. तर धान्य वितरण व्यवस्थेमध्ये कुचराई, साठेबाजी करणाऱ्यांसह प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आता फौजदारी स्वरुपाची कारवाई करण्याचे निर्देश राज्याचे कृषी मंत्री तथा माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी दिले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -