घरताज्या घडामोडीकरोना विरोधातील लढा अधिक प्रभावी करण्याची गरज : अपर मुख्य सचिव नितीन...

करोना विरोधातील लढा अधिक प्रभावी करण्याची गरज : अपर मुख्य सचिव नितीन करीर

Subscribe

जिल्ह्यातील कोरोना संसर्ग सध्यातरी नियंत्रणात असून येणार्‍या काळात संभाव्य संसर्ग वाढण्याची शक्यता विचारात घेऊन यंत्रणांनी सतर्क राहावे, अशा सूचना महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर यांनी दिल्या आहेत. करोनासह जगण्याची जीवनशैली स्वीकारताना संसर्ग हा कमी-अधिक होत राहणार आहे. ही बाब लक्षात घेता करोना विरोधातील लढा अधिक प्रभावी करण्याची आवश्यकता असून यासंदर्भातील दूरगामी नियोजन करणे आवश्यक आहे असेही डॉ.करीर यांनी सांगितले.

डॉ. नितीन करीर यांनी यापूर्वी पुणे जिल्ह्याचा आढावा घेतला असून आज नाशिक व जळगाव जिल्ह्याचा आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजन करण्यात करण्यात आले होते. यावेळी बोलतांना करीर म्हणाले, आगामी काळात जशी अनलॉक डाऊनची व्याप्ती वाढत जाईल तसतसे लोक प्रवास करतील, फिरतील, एकमेकांच्या संपर्कातही येतील. त्यातुन संसर्गही वाढण्याची शक्यता आहे, अशा परिस्थितीत करोनाशी आपला सुरू असलेला सामना सुरूच ठेवावा लागेल किंबहुना तो अधिक प्रभावी करावा लागेल. या आजाराबाबत जनमानसात असलेले गैरसमज व अनाठायी भीती दूर करावी लागेल. संख्यात्मक माहितीची मांडणी सकारात्मकरीत्या केली गेल्यास या आजाराबद्दल भीती दूर होईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. कोविड संसर्गानंतर बरे होणारे रुग्ण, रुग्णालयात अधिक काळ राहणारे रुग्ण, रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार घेणारे रुग्ण तसेच मृत्यू पावणारे रुग्ण या सर्व प्रकारांचे सविस्तर विश्लेषण करणे गरजेचे आहे. जिल्हा, शहर, गावात किती रूग्ण संख्या आहे याला महत्व नसून संसर्ग झालेल्या रुग्णांचे व्यवस्थापन कशा प्रकारे केले जात आहे विशेषतः अतिदक्षता विभागातील रुग्णांचे व्यवस्थापन किती प्रभावी आहे हे अधिक महत्त्वाचे आहे असेही यावेळी डॉ. करीर यांनी सांगितले. त्यामुळे अतिदक्षता विभागातील व्यवस्थापनावर लक्ष केंद्रीत करून तेथे अनुभवी डॉक्टरांच्या सेवा उपलब्ध करून द्याव्यात, असे डॉ करीर यांनी सांगितले. यावेळी विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, शहर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, पोलिस महानिरीक्षक छेरींग दोरजे, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हा पोलीस अधीक्षक (ग्रामिण) डॉ.आरती सिंह, उपायुक्त (महसूल) दिलीप स्वामी, रघुनाथ गावडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपील आहेर आदी यावेळी उपस्थित होते.

- Advertisement -

करोना जीवनशैलीबाबत जनजागृती आवश्यक
पावसाळा सुरू झाला असून सर्दी, खोकला, थंडीताप अशा संसर्गजन्य आजारांचे रूग्ण या काळात वाढतात. त्यामुळे पावसाळ्यातील संसर्गजन्य साथरोग व कोरोना यांच्या दुहेरी आव्हानांना सर्वांना सामोरे जावे लागणार आहे, हे लक्षात घेवून सर्व यंत्रणांनी नियोजन करावे. कंटेटमेंट झोन तयार करताना केवळ संसर्गित व त्याच्याशी संबंधित क्षेत्रातच त्याची अंमलबजावणी व्हावी, कंटेटमेंट झोनमुळे संबंध नसलेल्या लोकांचे जनजीवनावर त्याचा परिणाम होणार नाही याची काळजी घ्यावी. संसर्गितांना कुठेही सामाजिक भेदभावाचा सामना करावा लागणार नाही, त्यासाठी भेदभाव विरहित व भिती विरहित करोनासह जीवनशैलीसाठी येणार्‍या काळात आपल्याला जनजागृती करावी लागणार आहे, असेही यावेळी करीर यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -