अमरावती : राज्यभरात आज हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. नवनीत राणांकडून यानिमित्ताने सामुहिक हनुमान चालिसा पठणाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हनुमान चालीसावरून खासदार नवनीत राणा यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. नवनीत राणा म्हणाल्या की, तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारने केवळ हनुमान चालिसाचे पठण केले म्हणून मला 14 दिवस तुरूंगात डांबले. माझी लहान मुले मला विचारत होती, तू असा काय गुन्हा केला, असे म्हणताना त्यांना अश्रू अनावर झाले.
श्री हनुमान जयंती आणि खासदार नवनीत राणा यांच्या वाढदिवसानिमित्त बडनेरा मार्गावरील वीर हनुमानजी खंडेलवाल लॉन येथे आज (६ एप्रिल) सामुहिक हनुमान चालिसा पठणाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नवनीत राणासह आमदार रवी राणा आणि युवा स्वाभिमान पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी नवनीत राणा म्हणाल्या की, हनुमान चालिसा पठण करण्यासाठी मी उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी गेले होते. पण त्यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असल्यामुळे पोलिसांनी मला अटक केली होती. आज कारागृहातील अनुभव सांगताना नवनीत राण यांना अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले.
नवनीत राणा म्हणाल्या की, बाळासाहेब ठाकरे यांनी रक्ताचे पाणी करून हिंदू विचारधारा देशात निर्माण केली. मात्र उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या मेहनतीवर माती टाकण्याचे काम केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. जेल काय असते हे मला माहित नव्हते. पण उद्धव ठाकरेंनी मला जेल टाकले तेव्हा मी स्वत:ला विचारत होते की मी एवढी मोठी कोणती चुक केली की माझ्या महाराष्ट्राला अत्याचारी मुख्यमंत्री लाभले आहेत. माझ्यावर देशद्रोहाचा गुन्हा केला होता त्यामुळे मला न्यायालयात बेल सुद्धा मिळाली नाही, असेही नवनीत राणा यांनी सांगितले.
त्या म्हणाल्या की, तुरुंगात पाणी मागितले तर मला पाणी दिली नाही, मला वॉशरूम वापरू दिले नाही. १४ दिवसांनी मी बाहेर आले पण मला एक महिना आतमध्ये ठेवण्याचा प्लॅन केला होता. माझी लहाम मुले मला विचारत होती की, आई तु काय केले आहे, तुला तुरूंगात का टाकले आहे?, असे बोलताना नवनीत राणा यांना अश्रू अनावर झाले. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीला इशारा देताना सांगितले की, यापुढे महाराष्ट्रात महाविकास आघाडीची जिथे सभा होईल तिथे आमचे कार्यकर्ते हनुमान चालिसा पठण करतली आणि ती जागा पवीत्र करतील.