अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांशी हुज्जत घातल्याप्रकरणी आणि सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी राणा दाम्पत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशातच नवनीत राणा यांनी खार पोलिसांवर अनुसूचित जातीची असल्याने भेदभाव करणारी वागणूक दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. कोठडीतल्या वागणुकीबाबत नवनीत राणांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहिलं होतं. मात्र, या प्रकरणाबाबत २४ तासांत रिपोर्ट सादर करण्याचे आदेश लोकसभा सचिवालयाने दिले आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाने महाराष्ट्र सरकारच्या रिपोर्ट आधारे नोट द्यावी, असे आदेशात म्हटले आहे. त्यामुळे आता राज्य सरकारला याबाबत उत्तर द्यावे लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
काय म्हणाल्या नवनीत राणा?
नवनीत राणांनी पोलिसांवर गंभीर आरोप करत पत्र लिहिले आहे. जेलमध्ये आपल्याला अत्यंत वाईट वागणूक दिली जाते. २३ तारखेला रात्रभर खार पोलीस स्टेशनमध्ये पाणीही देण्यात आले नाही, असा आरोप करण्यात आला आहे. तसेच जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली, कारण मी अनुसूचित जातीची आहे. त्यामुळे मला पाणी पिण्यासारखा मुलभूत हक्कही नकारण्यात आला. असा गंभीर आरोप राणांनी पत्राद्वारे केला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरूनच आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांना पोलिसांनी अटक केल्याचं पत्रात म्हटलंय. पोलीस आयुक्त, एसीपी आणि डीसीपी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी देखील नवनीत राणांनी लोकसभा अध्यक्षांकडे केली आहे.
देवेंद्र फडणवीसांचा गंभीर आरोप
खासदार नवनीत राणा यांना कारागृहात अतिशय हीन वागणूक देण्यात आली. त्या मागासवर्गीय समाजाच्या आहेत, याची त्यांना जाण करून देण्यात आली. प्यायला पाणी सुद्धा देण्यात आले नाही. एक महिला असताना त्यांना प्रसाधन गृहात जाऊ देण्यात आले नाही, असं ट्विट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.
खा. नवनीत राणा यांना कारागृहात अतिशय हीन वागणूक देण्यात आली.
त्या मागासवर्गीय समाजाच्या आहेत, याची त्यांना जाण करून देण्यात आली. प्यायला पाणी सुद्धा देण्यात आले नाही. एक महिला असताना त्यांना प्रसाधन गृहात जाऊ देण्यात आले नाही : देवेंद्र फडणवीस @Dev_Fadnavis— @OfficeOfDevendra (@Devendra_Office) April 25, 2022
हेही वाचा : मोदी सरकारची २६ मे रोजी आठवी वर्षपूर्ती, देशात हनुमान चालिसाचं पठण करणार