सरत्या २०२१ वर्षाला बाय बाय करत सर्वच राजकीय नेते नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही जनतेला नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. थांबायचं नाही. पण सतर्क आणि सावध राहायला हवं. कितीही आव्हानं येऊ देत. त्यावर आपण मात करूया. नव्या वर्षात हिच हिंमत बांधुया. आरोग्यदायी, समृद्ध महाराष्ट्र आणि बलशाली भारत घडवण्यासाठी एकजूट होऊया, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
नवीन वर्ष आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि भरभराट घेऊन येवो. त्यासाठी आरोग्यदायी संकल्प करूया असे मुख्यमंत्री म्हणाले आहेत. तर नववर्षाचे स्वागत करताना जगावर आलेल्या कोरोना संकटाचे भान राखावे. गर्दी नकोच आणि आपल्या वागण्यातून, बेफिकिरीतून संसर्ग वाढीला हातभार लागणार नाही, याची खबरदारी घ्या असे आवाहन राज्यातील जनतेला मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.
थांबायचं नाही. पण सतर्क आणि सावध राहायला हवं. कितीही आव्हानं येऊ देत. त्यावर आपण मात करूया. नव्या वर्षात हीच हिंमत बांधुया. आरोग्यदायी, समृद्ध महाराष्ट्र आणि बलशाली भारत घडवण्यासाठी एकजूट होऊया, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) December 31, 2021
नवे वर्ष हे आपल्याला नवनवीन संकल्पांसाठी प्रेरणा देते. अनेकजण अडथळ्यांना दूर सारून नवे संकल्प करतात. नव्या उमेदीने उभे राहतात. याच उभारीतून एक-एकजण म्हणता- म्हणता आपला समाज आणि आपण आव्हानांवर मात करण्यासाठी सज्ज होतो. हिच जिद्द बाळगून आपल्याला पुढे जायचे आहे. नवनवीन संकल्पांसाठी सिध्द व्हायचे आहे. कितीही आव्हानं येऊ देत त्यांच्या छाताडावर उभे राहून यशाला गवसणी घालण्याची हिंमत बांधायची आहे.
यातूनच आपल्याला समृद्ध महाराष्ट्र आणि पर्यायाने बलशाली भारत घडवायचा आहे. त्यासाठी आणि नवीन वर्ष आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि भरभराट घेऊन येईल याकरिता मनःपूर्वक शुभेच्छा आणि नववर्षाभिनंदन असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुभेच्छा देताना म्हटलं आहे.
हेही वाचा : फर्जीवाडाविरुद्ध लढाई सुरुच राहणार, नवाब मलिकांनी दिल्या नववर्षाच्या हटके शुभेच्छा