‘निसर्ग’ चक्रिवादळ रायगड जिल्ह्यात धडकलं आहे. कोकण किनारपट्टीवर वाऱ्याचा वेगही वाढला आहे. महाराष्ट्राच्या किनारपट्टीला भागात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबईसह श्रीवर्धन, अलिबाग तसंच सिंधुदुर्गात सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पावसाला सुरवात झाली आहे. अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या आहेत. तर काही ठिकाणी वीज पुरवठाही खंडीत झाला आहे.
निसर्ग चक्रीवादळाने अलिबागच्या किनाऱ्यावर धडक दिली आहे. अलिबागमध्ये जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत आहे. लँडफॉल पूर्ण होण्यास सुमारे ३ तास लागतील, असं हवामान खात्यानं म्हटलं आहे. हवामान खात्यानं मुंबईत उच्च भरतीची शक्यता व्यक्त केली आहे. बुधवारी रात्री ९.४८ मिनिटांनी भरतीला सुरुवात होणार असल्याचा इशआरा दिला आहे. दरम्यान, वादळाच्या पार्श्वभूमीवर वांद्रे-वरळी समुद्रमार्गावरील वाहतूक थांबवण्यात आली आहे.
हेही वाचा – NisargCyclone: निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने केलेल्या उपाययोजना
चक्रीवादळाचा मोर्चा तीन तासांमध्ये मुंबई, ठाण्याकडे
मुंबई हवामान विभागानं दुपारी दीड वाजता निसर्ग चक्रीवादळाबाबत ताजं बुलेटिन प्रसिद्ध केलं आहे. यामध्ये निसर्ग चक्रीवादळ जमिनीला कशा प्रकारे धडकेल याबाबत माहिती देण्यात आली आहे. निसर्ग चक्रीवादळ सध्या अलिबागमध्ये पोहोचलं असून ते पुढील तीन तासात मुंबई, ठाण्याच्या काही भागांना धडकणार आहे. चक्रीवादळाची जमिनीला धडकण्याची प्रक्रिया येत्या तीन तासात पूर्ण होण्याची शक्यता आहे. सध्या अलिबागला स्पर्श झालेल्या चक्रीवादळाचा वेग हा १२० किमी प्रतितास पेक्षा अधिक आहे, असं प्रादेशिक हवामान विभाग, मुंबईचे उप महासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितलं.