भाजप आमदार नितेश राणे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. हिंदू सणांवर लागू करण्यात आलेल्या निर्बंधाबाबत ही भेट घेण्यात आली. भेटीनंतर नितेश राणे यांनी म्हटलं आहे की, सगळ्या हिंदू सणांवर अतिषय नियोजितपणे निर्बंध कसे टाकायचे, हिंदू सणांवर मागे विविध निर्बंध लावून त्या सणांचे महत्त्वच कमी करायचे हाच या ठाकरे सरकारचा किमान समान कार्यक्रम राहिलेला असल्याचे दिसत आहे. नियमावली काढलेली आहे. गेल्या वर्षीची दिनांक बदलून तोच जीआर काढला आहे. त्याच्यामध्ये असे निर्बंध टाकले आहेत जेणेकरुन हे सण साजरेच करु नका, आणि हळू हळू मुंबईत मोठ्या मोठ्या गणेश मुर्त्यांच्या निघणाऱ्या मिरवणूका आणि जे एक उत्साहाचे वातावारण या सणामुळे मुंबईत असायचे या सगळ्यालाच नियोजित पद्धतीने संपवण्याचे काम या ठाकरे सरकारने केले असल्याचे नितेश राणेंनी म्हटलं आहे.
दरम्यान नितेश राणे यांनी म्हटलं आहे की, पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी करत आहेत तेच काम उद्धव ठाकरे मुंबई आणि महाराष्ट्रात करत आहेत. या वर्षी एवढे अती केलं आहे की, घरामध्ये असलेल्या मुर्त्या ६ इंच करा आणि त्याला विसर्जन करण्यासाठी बीएमसीचे लोकं तुमच्या घरी येणार आणि विसर्जन करण्यास घेऊन जाणार, मुंबईतील छोट्या छोट्या मिरवणूकाही बंद करणार आहेत अशी प्रतिक्रिया नितेश राणे यांनी दिली आहे.
राजकीय कार्यक्रमांवर नितेश राणेंचा हल्लाबोल
हिंदू सणांचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा यांना कोरोना आठवतो मात्र शनिवारी बीईएसटीचा कार्यक्रम झाला तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित होते. या कार्यक्रमात गर्दी दिसत नाही. मेट्रोच्या कार्यक्रमात गर्दी दिसत नाही. यांच्या पार्ट्या होतात तिथे यांना कोरोना दिसत नाहीत. पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित राष्ट्रवादी कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले तेव्हा गर्दी दिसत नाही. पण जेव्हा जेव्हा आमचे सण आले की यांना कोरोना दिसतो.
राज्यपालांचे आश्वासन
भाजप नेते नितेश राणेंनी म्हटलं आहे की, राज्यापालांना बोललो की “मुंबईत सणांच्या दिवशी होर्डिंग लागतात यावर सगळ्या गणेश मंडळांचे आर्थिक गणितं असतात त्याचा आता होर्डिंगवर बंदी घातली आहे”. होर्डिंग लावल्याने कोणता कोरोना पसरतो याचा अर्थ राज्य सरकारने सांगितले पाहिजे असा घणाघात नितेश राणे यांनी केलं आहे. राज्यपालांनी सांगितले आहे की, “तुम्ही जे करायचं आहे ते करा तसेच मला जे काम करायचे आहे ते मी करेल” असे आश्वासन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिले असल्याचे नितेश राणे यांनी म्हटलं आहे. हिंदूमध्ये भीतीचं वातावरण तयार करण्याचं काम राज्य सरकार करत आहेत.