जळगाव : गेल्या काही दिवसांपासून राज्यात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे गायब झालेली थंडी गेल्या तीन दिवसांपासून परतली आहे. जळगावचा पारा पुन्हा एकदा घसरला असून पारा ८ अशांवरून ६ अशांपर्यंत खाली आला. गुरुवारी जळगावमध्ये राज्यातील सर्वात निचांकी तापमानाची नोंद करण्यात आली.
उत्तर महाराष्ट्रात यंदा थंडीचा कहर सुरू आहे. जळगावसह धुळ्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस घसरतोय. मागील दोन दिवसांत धुळ्याचे तापमान चक्क 2.8 पर्यंत नोंदवले गेले. तर नंदुबारच्या डोंगराळ भागातही तापमान 4 अंशापर्यंत खाली येत आहे. तर नाशिक जिल्ह्यातल्या निफाडमध्येही तापमान साडेचार अंशापर्यंत खाली घसरत आहे. त्यामुळे दिवसभर हुडहुडी भरते. सकाळी चक्क दहा वाजेपर्यंत रस्ते निर्मनुष्य रहात आहेत.
दरम्यान, या थंडीमुळे शेतकर्यांचे धाबे दणाणले आहे. केळी, पपई आणि द्राक्षांना याचा मोठा फटका बसणार आहे. खरे तर गेल्या रविवारपासून मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तापमान घसरले आहे. पुढील दोन दिवस ही लाट कायम राहण्याचा अंदाज वर्तवण्यात येतो. किमान तापमान हे दहा अंशाच्या खाली आणि कमाल तापमान 28 अंशांच्या सरासरीपेक्षा 4 ते 6 अंश सेल्सिअसने कमी नोंदवल्यास त्याला थंडीची लाट म्हणतात.
धुळ्यात निच्चांक
धुळे जिल्ह्यात चार दिवसांपासून कडाक्याची थंडी आहे. थंडीपासून बचावासाठी नागरिकांनी ठिकठिकाणी शेकोट्या पेटवलेल्या दिसतात. शेतीवर थंडीचे गंभीर परिणाम होत आहेत. भाजीपाला, कडधान्याचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे.
द्राक्षासह कांद्यालाही धोका
कडाक्याच्या थंडीमुळे द्राक्ष मण्यांची फुगवण थांबली असून, ते तडकण्याचा धोका आहे. गहू, हरभरा, भाजीपाला, कांदा, द्राक्ष यांच्यावर या हवामानाचा गंभीर परिणाम होताना दिसून येत आहे. शेतकरी पिकांवर वेगवेगळी औषध फवारत आहेत. त्यामुळे खर्च वाढलाय. तर दुसरीकडे धुक्यामुळे बुरशी, तांबेरा, करपा, भुरी, टिक्का, मावा, तुडतुडे या रोगाची भीती वाढली आहे. सध्या कांद्यावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव दिसत आहे. यामुळे पीक धोक्यात आहे.