आज, शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान किसान सन्मान निधीचा आठवा हप्ता जाहीर केला असून तो बळीराजाच्या खात्यात थेट पाठवला आहे. पंतप्रधान किसान सन्मान योजना (PM Kisan Samman Nidhi Yojana) या अंतर्गत ९.५ कोटी लाभार्थी शेतकरी कुटुंबांना १९ हजार कोटींपेक्षा जास्त रक्कम जाहीर करण्यात आली आहे. म्हणजेच ९.५ कोटी शेतकरी कुटुंबांच्या खात्यात पंतप्रधान किसान सन्मान निधीचे (PM Kisan Samman Nidhi Yojana) २ हजार रूपये पाठविले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत आर्थिक लाभाचा आठवा हप्ता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जाहीर केला. हा आठवा हप्ता नऊ कोटी ५० लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला असून, यासाठी १९ हजार कोटी रुपये निधीचं वितरण करण्यात आलं.
यावेळी पंतप्रधान मोदींनी उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, मेघालय, जम्मू-काश्मीर अशा पाच राज्यांतील शेतकऱ्यांशी संवाद साधला. महाराष्ट्रातील लातूरचे शेतकरी बाबा नरारे यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळाला आहे. नरारे यांनी यावेळी बोलताना, आपल्याला केवळ दोन दिवसांत कर्ज मंजूर झालं असून, त्यामुळे सेंद्रीय शेती करता आली, असं सांगितलं.
Baba Narare Ji from Latur in Maharashtra has been benefited financially by the PM-KISAN scheme. His loan was sanctioned within 2 days and he could continue growing his organic vegetables. #PMKisan @AgriGoI @narendramodi @PMOIndia
— MyGovIndia (@mygovindia) May 14, 2021
यावेळी कृषी क्षेत्रात नवनवीन प्रयोग करण्याचा सरकार प्रयत्न करत असून, जैविक शेतीला प्रोत्साहन देणं, याचाच एक भाग असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ‘प्रधानमंत्री किसान सम्मान निधी’ योजनेचा आठवा हप्ता आज पंतप्रधानांनी वितरीत केला, त्यावेळी ते बोलत होते. कोविड महामारीच्या काळात शेतकऱ्यांनी ज्याप्रमाणे उत्तम उत्पादन करुन विक्रम केला, त्याचप्रमाणे सरकार किमान आधारभूत किंमतीवर खरेदीत नवीन विक्रम करत असल्याचं पंतप्रधान म्हणाले. कोरोना विषाणू विरुद्धच्या लढ्यात लस हा एक महत्वाचा टप्पा असून, नागरिकांनी अवश्य लसीकरण करुन घेण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं.