मराठा आरक्षणाबाबत सरकार संभाजीराजे यांची बाजू समजू घेत आहे. संभाजीराजे अनेक राजकीय नेत्यांना भेटून या विषयावर पर्याय सूचवू पाहत आहेत. पण सर्वात महत्वाची भेट म्हणजे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी घडणे गरजेचे आहे. कारण मराठा आरक्षणाचा प्रश्न आता राज्याच्या हातात राहिलेला नाही. मराठा आरक्षणाचा प्रश्न आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार केंद्राच्या कोर्टात गेलेला आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक राजकीय पक्ष हा छत्रपती संभाजीराजे यांच्या भूमिकेशी सहमत आहे. आपण सगळे उठून पंतप्रधान यांच्याकडे जाऊयात. त्यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना, कॉंग्रेस असा प्रश्न येत नाही. नरेंद्र मोदी यांच्या हातात हुकूमाची पाने आहेत, त्यांनी ती पाने टाकावीत असे आवाहन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले. मुंबईत पत्रकारांशी बोलताना त्यांनी केंद्राने आणि विशेषतः नरेंद्र मोदी यांनी या विषयावर तोडगा काढण्याचेही आवाहन त्यांनी यावेळी केले. महाराष्ट्र सरकार, उद्धव ठाकरे, कॉंग्रेस पक्ष हे सगळे संभाजी राजे यांच्या भूमिकेसोबत आहेत, याचाही त्यांनी पुर्नउच्चार केला.
हुकुमाची पानं मोदींच्या हाती असतील तर तुमची गरजच काय ? असा प्रश्न विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता प्रवीण दरेकर यांनी केला आहे. महाविकास आघाडी कायमच जी गोष्ट आपल्याला जमत नाही, ती गोष्ट केंद्राकडे ढकलण्याचा पवित्रा घेते. संजय राऊत यांना रोज मोदी आणि भाजपवर बोलल्याशिवाय चैनच पडत नाही, असाही टोला दरेकर यांनी लगावला. संजय राऊत यांच्या भाजपच्या टीकेचाही त्यांनी समाचार घेतला. त्याचवेळी मराठा आरक्षणाच्या निमित्तानेही महाविकास आघाडी सरकार हे केंद्राकडे बोट दाखवत असल्याबाबत त्यांनी टीका केली. मराठा आरक्षणाच्या विषयावर जर मोदीच सगळ करणार असतील तर तुमच्या सत्तेचा उपयोग काय असाच काहीसा रोख प्रवीण दरेकर यांच्या प्रतिक्रियेचा होता.
दरम्यान संभाजीराजे छत्रपती यांनी शुक्रवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने बोलताना त्यांनी मराठा आरक्षणाच्या विषयावर राज्य सरकारने ते काही मतभेद असतील ते आरक्षणाच्या विषयाच्या निमित्ताने विसरून या प्रश्नावर केंद्राशी बोलणे करून मार्ग काढण्याची विनंती केली. त्यामुळे इगो विसरत मराठा आरक्षणाच्या विषयावर तोडगा काढण्यासाठी केंद्राची मदत घेण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. शिवाय मराठा आरक्षणाच्या विषयावर यापुढच्या काळात पुर्नयाचिका दाखल करताना कोणत्याही गोष्टी अपुऱ्या राहणार नाहीत, याचीही काळजी घेण्याची गरज असल्याचे मत त्यांनी मांडले.