पश्चिम बंगालमध्ये निवडणूकींचा धुरळा बसला आहे. भाजपला पराभूत करुन तृणमुल काँग्रेसने आपली सत्ता राखण्यात यश मिळवले आहे. परंतु निवडणूकींच्या निकालानंतर पश्चिम बंगालमध्ये विविध भागांत हिंसाचार उफाळला आहे. या हिंसाचारात बॉम्ब फेक, भाजप कार्यालयांची तोडफोड, हत्या, कार्यालये आणि घरांना आग लावण्याच्या घटना घडत आहेत. वाढत्या हिंसाचाराचे पडसाद आता पश्चिम बंगालसह देशात उमटू लागले आहेत. महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात पश्चिम बंगालच्या हिंसाचारावरुन वादावादी सुरु झाली आहे. विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर टीका करण्यात येत आहे. बंगालमध्ये वाघीण जिंकली म्हणणारे हिंसाचाराच्या घटनेवर मुग गिळून गप्प आहेत. अशी खोचक टीका विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.
विचारांची लढाई विचारांनी लढली जावी,तिथे हिंसाचारास थारा नसावा! निवडणुकीनंतर बंगालमध्ये सुरू असलेला हिंसाचार अतिशय निंदनीय असून, हे थांबले पाहिजे!
बंगालमध्ये वाघीण जिंकली म्हणणारे, हिंसाचाराच्या घटनेवर मुग गिळून गप्प आहेत!
अशा घटनांचे समर्थन होऊ शकते का? #BengalBurning— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) May 4, 2021
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ट्विट करत शिवसेनेवर टीका केली आहे. विचारांची लढाई विचारांनी लढली जावी,तिथे हिंसाचारास थारा नसावा, निवडणुकीनंतर बंगालमध्ये सुरू असलेला हिंसाचार अतिशय निंदनीय असून, हे थांबले पाहिजे बंगालमध्ये वाघीण जिंकली म्हणणारे, हिंसाचाराच्या घटनेवर मुग गिळून गप्प आहेत.अशा घटनांचे समर्थन होऊ शकते का? असा सवालही दरेकरांनी उपस्थित केला आहे. बंगालमध्ये भाजपकडे गमावण्यासारखं काहीही नव्हतं, आज जेवढे आमदार निवडून आले आहेत, त्यामागे स्थानिक कार्यकर्त्यांचे समर्पन आहे. बंगालमध्ये वाढलेल्या जागा व मतांची वाढलेली टक्केवारी ही कार्यकर्त्यांना समर्पित आहे. परंतु ही हिंसा थांबली पाहिजे असे प्रवीण दरेकरांनी म्हटले आहे.
शिवसेनेचा ममता बॅनर्जींचा वाघिण म्हणून उल्लेख
टीएमसीच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांचा बंगाल विधानसभा निवडणूकीत विजय झाल्यावर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ममता दीदींना शुभेच्छा दिल्या होत्या. यावेळी मुख्यमंत्र्यांनी ममता बॅनर्जी या बंगाली जनतेच्या स्वाभिमानाचा लढा एकाकी लढत होत्या. त्यांच्या हिमतीला दाद द्यावीच लागेल. अखेर त्यांचा विजय झाला आहे. या विजयाचे संपूर्ण श्रेय हे या वाघिणीला द्यावे लागेल अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शुभेच्छा दिल्या होत्या. यावरुन भाजप नेते व विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी टीका केली आहे.